ऑनलाईन टीम / सातारा :
सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारच्या अहवालात 2502 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून, जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी रेट 34.01 टक्क्यांवर पोहचला आहे. मृत्यूदरही उच्चांकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. आरोग्य यंत्रणेवरील हा ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उद्यापासून जिह्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
4 मे 2021 सकाळी 7 वाजल्यापासून 10 मे 2021 रात्री 12 या कालावधीसाठी सातारा जिल्ह्यात लॉकडाऊनचे नवे आदेश पारित करण्यात आले आहेत.
सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, मिठाई, बेकरी इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, मासे, अंडी यासह) पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पुर्णपणे बंद राहतील, तथापि, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी सा 7.00
ते सकाळी 11.00 वा कालावधीतच चालू ठेवणेस परवानगी राहील.
कृषी अवजारे व शेतीशी उत्पादनाशी संबंधित दुकाने सकाळी सात ते अकरा या कालावधीत सुरू राहतील.या दुकानांची घरपोच सेवा सकाळी सात ते सायंकाळी पाच या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12 ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहील.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीला पालकमंत्री पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.