सातारा/प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. दि. 7 जुलै रोजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेने सर्व ग्रामसेवकांना सक्त सूचना दिल्या गेल्या आहेत.काही ग्रामसेवकांनी त्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू केली आहे. कोरेगाव तालुक्यातील ग्रामसेवक आघाडीवर आहेत. तर सातारा तालुक्यातील ग्रामसेवक पिछाडीवर आहेत. चार चाकीमधून ज्यादा प्रवाशी दिसले तर कारवाई करण्यात येत आहे. कारवाई करणाऱ्या ग्रामसेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप कधी उमटणार असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिक नियम मोडत सुसाट सुटले आहेत. प्रत्येक गावांमध्ये आता कोरोना बाधिताचा आकडा दिसू लागला आहे. दररोज 50 च्या दरम्यान नवे कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. हे धोक्क्याचे चित्र निर्माण होत असताना त्यास कुठे तरी प्रतिबंध लागावा याकरता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 7 रोजी नवीन कडक नियमावली जारी करण्यात आली आहे.मात्र, नागरिकांनी नियम पाळले तर कोरोना लगेच आटोक्यात येईल. नियम मोडणारे रस्तोरस्ती दिसू लागले आहेत. दुचाकी चालक गुटखा खाऊन गाडी वरून पिंक मारतात. दुचाकी वरून डबल सीट जातात. त्यांच्यावर पोलीस कारवाई करत आहेतच पण ग्रामसेवक, तलाठी हे ही आता कारवाई करू लागले आहेत. जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिल्या गेलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ग्रामसेवक कारवाई करण्यासाठी सरसावले आहेत. त्यात कोरेगाव तालुका अग्रभागी आहे तर सातारा तालुका पिछाडीवर आहे. काही ग्रामसेवक तर गावाकडे फिरकत नाहीत असेच समजते.
गोळेवाडीच्या अण्णासाहेबांची कमाल
गोळेवाडी या कोरेगाव तालुक्यातील ग्रामसेवक निलेश बर्गे यांनी कोरोनाची नियमावली गावात कठोरपणे राबविण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांनी गावात जे चार चाकी वाहन घेऊन येतात त्यांच्याकडून नियम मोडल्याचे दिसताच त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. भरारी पथकाने गावात भेट दिली तेव्हा गावात चांगले प्रबोधन झाल्याचे कौतुक भरारी पथकाने केले आहे. आता पर्यंत 71 हजार 500 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दोन चाकीवर एक पेक्षा जास्त व्यक्ती व तीन चाकीवर तसेच चार चाकी गाडी मध्ये तीन व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती गाडीत बसून प्रवास करताना सापडले तर प्रत्येक एक हजार रुपये दंड करण्यात आला आहे. तरी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदेशाचे पालन करावे अन्यथा दंडास पाञ राहाल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.