प्रतिनिधी / सातारा
सोमवारी बाधित वाढीचा वेग थोडासा तरी मंदावल्याचा दिलासा लाभत असताना सविस्तर आलेल्या अहवालाने जिल्हा हादरला आहे. एकाच दिवशी तब्बल 41 जण बाधितांचा बळी गेल्याची नोंद झाली असून दि. 11 ते 19 एप्रिल या 9 दिवसात कोरोनाने कहर मांडला आहे. या नऊ दिवसात तब्बल 191 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतरचा हा आकडा असून बाधित वाढीच्या विस्फोटामुळे जिल्हय़ात बेड मिळणेही दुरापास्त झाल्याने ही अवस्था आलीय. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही लढाई माणसे वाचवण्याची असून आरोग्य विभाग, प्रशासनाने कृतीशील दिलासा देण्याचा गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, रविवारी रात्रीच्या अहवालात 1,212 जणांचा अहवाल बाधित आला तर उपचारादरम्यान 41 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सांयकाळी 381 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय. केंद्र सरकारने दि. 1 पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे जाहीर केले आहे. तर राज्यात लॉकडाऊनची कडक होवू लागली असून आता अत्यावश्यक सेवा देखील सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार असून सहकारी, खासगी कार्यालये, बँका स. 9 ते 2 या वेळेतच सुरु राहणार आहेत.
रेमडिसीवरच्या तुटवडय़ाने वाढले बळी
सातारा जिल्हय़ात बाधित संख्या कमी होती तेव्हा रेमडिसीवीरचा वापर सुरुच होता. मात्र, बाधित वाढल्याने रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा एवढा जाणवू लागला की त्याचा काळाबाजारही होवू लागल्याने जिल्हाधिकाऱयांना त्यावर नियंत्रणासाठी पथक नेमावे लागले. त्यानंतर देखील रेमडिसीवरचा साठा उपलब्ध होवू शकलेला नाही. त्यामुळे जिल्हय़ात बळींची संख्या वाढू लागलीय. मात्र, रेमडिसीवीर हा अंतिम उपचाराचा पर्याय नसल्याचे सांगत बोळवण करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. रविवारी तर रेमडिसीवर इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाईंकांची धावाधाव सुरु होती. कारण त्या हॉस्पिटलातील डॉक्टर्सच ते रेफर करत होते. ते न मिळाल्याने अनेकांना जीव गमावण्याची वेळ आलीय.
खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांसाठी कार्यशाळा
जिह्यात मोठय़ा प्रमाणात मृत्यू संख्येत दैनंदिन वाढ होत आहे. रुग्ण इतिहास पाहिला असता हॉस्पिटलला येण्यापूर्वी रुग्ण अनेक ठिकाणी उपचार करुन आणि उशिरा हॉस्पिटलला आलेला आहे, असे दिसून येते. यावरुन रुग्णाची वेळेत कोविड टेस्ट न करणे, त्यास वेळेत रेफर न करणे, अचुक मार्गदर्शन व उपचार न झाल्याचे दिसून येते. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांची दि. 21 एप्रिल रोजी कार्यशाळा आयोजित करुन पुनर्प्रशिक्षण देण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी दिल्या आहेत. या प्रशिक्षणास वैद्यकीय व्यवसायीक अनुपस्थित राहील्यास त्यांचेवर साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई केली जाईल याची समजही देण्यात यावी, असेही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले .
कोरोनामुक्ती-बाधित वाढीचे प्रमाण व्यस्त
गेल्या 9 दिवसात म्हणजे 11 ते 19 एप्रिल या कालावधीत जिल्हय़ात बाधित वाढीचा वेग प्रचंड वाढला असून एकूण 10 हजार 828 जणांचा अहवाल बाधित आला. तर त्यापैकी फक्त 3 हजार 994 जण कोरोनामुक्त झाल्याने बाधित वाढ व कोरोनामुक्तीचे प्रमाण व्यस्त झालेय. त्यामुळे उपचारार्थ रुग्ण संख्या वाढली असून ती 13,471 एवढी झाली असली तरी प्रत्यक्ष दवाखाना व कोरोना केअर सेंटरमध्ये फक्त 2,668 एवढेच रुग्ण आहेत. उर्वरित 10 हजारांवर बाधित होमआयसोलेट आहेत.
प्रशासनाकडून कृतीशीलतेची गरज
जिल्हय़ातील बाधितांच्या मृत्यूचे तांडव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल 41 एवढय़ा उच्चांकी संख्येने बाधितांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली असून मृत्यूचे प्रमाण का वाढलेय ? याला लवकर बेड न मिळण्याची स्थिती कारणीभूत आहे का? आणि तसे असेल तर आता लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने हातावर हात मारुन बसण्यापेक्षा जिल्हय़ात निर्माण झालेली स्थिती सुधारण्यासाठी कंबर कसली पाहिजे. जर जिल्हय़ात 80 टक्के रुग्ण होम आयसोलेट आहेत आणि प्रत्यक्ष उपचारासाठी 20 टक्के रुग्ण येत असतील अशी स्थिती निर्माण होण्याचे कारणच नाही. मात्र, एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर बळी गेल्याने आता प्रशासनाने कृतीशील अर्लटपणा दाखवण्याची गरज आहे.
नियमांचे पालन करुन कोरोनाची साखळी तोडूया
कोरोनाची लक्षणे असूनही काही रुग्ण दुर्लक्ष करीत आहेत. दुर्लक्षामुळे संपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होत आहे. रुग्ण उशिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर उपचार करण्यास अडचणी येत आहेत. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी शासनाने घातलेल्या निर्बंधांचे कोटोकरपणे पालन करण्याबरोबर मास्कचा, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर राखणे महत्वाचे आहे. ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना बाधित आहे त्या कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. प्रशासनाने घातलेल्या नियमांचे पालन करुन सर्वांनी संघटीत होवून कोरोना संसर्गावर मात करु या, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.
कडक लॉकडाऊनची शक्यता : एसपी अजयकुमार बंसल
प्रयत्न करूनही कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नसल्याने राज्यात कडक लॉकडाउन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या दोन दिवसात या बाबत राज्य सरकार निर्णय घेईल, अशी माहिती पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी महाबळेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी महाबळेश्वरचे पोलिस निरिक्षक बी. ए कोंडुभैरी हे उपस्थित होते. कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजयकुमार बन्सल यांनी शहरातुन फेरफटका मारून लॉकडाउनच्या नियमांचे महाबळेश्वरचे नागरीक किती पालन करतात याची माहिती घेतली. दुकानदारांशी संवाद साधला व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
ऑक्सिजन व सिंलेंडरची वाहतूक रोखू नका
सातारा जिह्यातील शासकीय वा खाजगी रुग्णालयांना पुणे, कोल्हापूर येथील ऑक्सिजन निर्मित करणाऱया प्रकल्पांमधून ऑक्सिजन टँकर, हॉस्पिटलमधील छोटे-मोठे ऑक्सिजन सिलेंडर मधून पुरवठा करण्यात येत आहे. या वाहनांना कोरोना स्थितीत पथकरातून सूट देण्यात आलेली असल्यामुळे पथकर नाक्यावर अन्य कोणत्याही कारणास्तव या वाहनांची अडवणूक करण्यात येवू नये. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरुन ऑक्सिजन टँकर, हॉस्पिटलमधील छोटे-मोठे ऑक्सिजन सिंलेंडरची वाहतूक करणाया वाहनांसाठी स्वतंत्र लेन राखीव ठेवावी अथवा सुरु असलेल्या लेनमधून ही वाहने तात्काळ सोडण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
बेडसाठी धावाधाव आणि भीतीचे माहोल
जिल्हय़ात पहिल्या लाटेपेक्षा चिंताजनक स्थिती एप्रिल महिन्यात उद्भभवलेल्या दुसऱया लाटेत निर्माण झालीय. बाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या, ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. लोकांच्या मनातील भीती कमी करण्याचे आरोग्य विभागाचेच आहे. तपासण्या केल्या की जबाबदारी संपत नाही. जे बाधित आलेत त्यांच्यावर उपचार झालेच पाहिजेत. होम आयसोलेशनमुळे आरोग्य विभागाचा ताण हलका झालेला आहे. मात्र, दुसरीकडे प्रत्यक्ष उपचारार्थ रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार, सुविधा मिळायलाच हव्यात. उगाच तपासण्या वाढवल्यात अन उपचार मिळत नसतील तर सर्वच धावाधाव व्यर्थ ठरेल. दिलासा कृतीशील असायला हवा हे निश्चितच.
प्रत्यक्ष उपचारार्थ 2,767 रुग्ण
जिल्हय़ात एकूण बेड 3 हजार 379 एवढे असून 612 बेड जिल्हय़ात रिक्त आहेत. आजमितीस एकूण उपचारार्थ रुग्ण संख्या 13,471 असल्याचे अहवाल सांगतोय. मात्र, प्रत्यक्ष कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये 2,139 तर कोरोना केअर सेंटरमध्ये 628 असे एकूण 2 हजार 767 रुग्ण प्रत्यक्ष दवाखान्यात उपचार घेत आहेत. यानुसार मग 10 हजार 704 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यापैकी काहींना लक्षणेच नाही तर काहींना सौम्य लक्षणे आहेत. त्यांच्याशी आरोग्य विभागाचा संपर्क असल्याचे सांगण्यात आले.
सातारा शहर मोठा हॉटस्पॉट
सातारा शहरातील सर्व पेठांसह उपनगरांमध्ये बाधितांची संख्या मोठया प्रमाणावर वाढू लागलीय. रविवारी रात्रीच्या अहवालात एकटय़ा सातारा शहरात तब्बल 183 बाधित वाढ समोर आली असून चिंतेचा मोहोल वाढतच चालला आहे. सातारकरांना आता नियम पाळून घरात बसूनच कोरोनामुक्तीकडे जाण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तालुक्यात 249 बाधित समोर आलेत त्यापैकी सातारा शहरात 183 रुग्ण संख्या पाहता सातारा मोठा हॉटस्पॉट ठरलाय. पालिका प्रशासन व आरोग्य विभागासह नागरिकांसमोर ही स्थिती आव्हानात्मक असून त्यावर मात करण्यासाठी सजगता दाखवण्याचा संदेश परिस्थिती देत आहे.
जिल्हय़ात 41 बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सदरबझार ता. सातारा 72 वर्षीय पुरुष, एंकबे ता. कोरेगाव 45 वर्षीय महिला, माची पेठ सातारा 72 वर्षीय महिला, मोहितेवाडी ता. कोरेगाव 55 वर्षीय पुरुष, चिंचळी ता. कोरेगाव 60 वर्षीय महिला, फलटण 55 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, हिंगणगाव ता. सांगली 60 वर्षीय पुरुष, रानवडे ता. माण 73 वर्षीय महिला, केसर कॉलनी ता. सातारा 52 वर्षीय पुरुष, मोरे कॉलनी ता. सातारा 81 वर्षीय महिला, बिभवी ता. जावली 50 वर्षीय पुरुष, संगम माहुली ता. सातारा येथील 67 वर्षीय पुरुष व जिह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये क्षेत्र माहुली ता. सातारा 61 वर्षीय पुरुष, साखरवाडी ता. फलटण 75 वर्षीय पुरुष, टाकेवाडी ता. माण 42 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावळी 56 वर्षीय पुरुष, पिंगळी ता. माण 74 वर्षीय पुरुष, लोण ता. खटाव 75 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 72 वर्षीय पुरुष, संभाजीनगर ता. सातारा 68 वर्षीय पुरुष, नायगाव ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, कापिल ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, गणेशवाडी ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, केंजळ ता. वाई 30 वर्षीय महिला, चांदक ता. वाई 61 वर्षीय पुरुष, कोरेगाव ता. कोरेगाव 76 वर्षीय महिला, चव्हाणवाडी ता. पाटण 85 वर्षीय पुरुष, गोरेगाव ता. खटाव 68 वर्षीय पुरुष, असवली ता. खंडाळा 59 वर्षीय पुरुष, पांधरी ता. माण 70 वर्षीय महिला, कोपर्डी हवेली ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, बोपेगाव ता. वाई येथील 41 वर्षीय पुरुष, दौलतनगर ता. सातारा 57 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण 76 वर्षीय पुरुष, औंध ता. खटाव 58 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले कोरेगाव ता. कोरेगाव 69 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ ता. कराड 75 वर्षीय पुरुष, वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे 72 वर्षीय पुरुष, गोंदी ता. कराड 60 वर्षीय महिला, कानरवाडी ता. खटाव 70 वर्षीय महिला अशा एकूण 41 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 4,79,851
एकूण बाधित 82,955
एकूण कोरोनामुक्त 67,329
मृत्यू 2,155
उपचारार्थ रुग्ण-13,471
सोमवारी
कोरोनामुक्त 381
बळी 41
दुसऱ्या लॉकडाऊनच्या 9 दिवसांत 191 बळी, रेमडिसीवरच्या तुटवडय़ाने बळी वाढले
जिल्हय़ाची वाटचाल कडक लॉकडाऊनकडे, नियमांचे पालन करा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
गत नऊ दिवसात 10,828 बाधित, गत नऊ दिवसात मुक्त 3,994
बाधित-कोरोनामुक्तीचे प्रमाण व्यस्त, 1,212 जणांचे अहवाल बाधित
सोमवारी 381 जण कोरोनामुक्त, प्रत्यक्ष उपचारार्थ 2,767 रुग्ण
3379 पैकी 612 बेड रिक्त, आता लढाई माणसे वाचवण्याची
1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस, अत्यावश्यक सेवा
स. 7 ते 11 पर्यंतच ,खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांसाठी कार्यशाळा