अचूक बातमी “तरुण भारत” ची, बुधवार, 5 मे, सकाळी 11.00
● बाधित वाढीचा आकडा कमी येईना ● पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्याचे आव्हान ● कडक लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस ● बोगस ओळखपत्र घालून फिरणारेही रडारवर ● कडक लॉकडाऊनच्या सकारात्मक परिणामांची आशा ● कारवाईच्या मोहिमेचा वेग वाढवायची गरज
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या वाढत्या आकड्याची दाहकता कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊन सुरू झाला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पोलीस व महसूल प्रशासनाने कडक भुमिका घेतली. आज लॉकडाऊनचा दुसरा दिवस असून गेल्या 24 तासात 2376 नव्या रूग्णांची वाढ जिल्ह्यात झाली असून एकूण आकडा 1 लाख 12 हजारावर वर पोहचला आहे. सात दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा वाढत्या रूग्णसंख्येवर कितपत फरक पडेल याकडे प्रशासनासह जिल्हावासियांच्या नजरा आहेत.
मृत्यू संख्या रोखण्याचे प्रयत्न
जिल्ह्यात रूग्णसंख्या सातत्याने 2 हजारांच्या वर वाढत असतानाच कोरोना रूग्णांची मृत्यू संख्या रोखण्याला प्रशासनाने आता प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात 2 हजार 610 कोरोना रूग्णांचे बळी गेले असून पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट तरूणांच्या बळीला जास्त कारणीभूत ठरत असल्याचे दिसते. इतर आजार असलेल्या वयोवृद्धांसह 30 ते 45 वयोगटातील तरूणांचे मृत्यू धक्कादायक आहेत. हे मृत्यू रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून कोरोना झालाय हे उशीरा समजणे हे एक कारण त्यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच टेस्ट करा असे प्रशासन वारंवार सांगत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
सातारा, फलटण, कराड गंभीर वळणावर
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर कोरोना रूग्णवाढीचे संकट कायम आहे. जिल्ह्याच्या ग्रामिण भागातही कोरोनाने हातपाय वेगाने पसरले आहेत. ग्रामिण भागात नियम पाळण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्यानेच ही वाढ होत आहे. सातारा तालुका, कराड तालुका, फलटण तालुका, खटाव-माण तालुक्यातील वाढती रूग्णवाढ रेखायची कशी हा प्रश्नच आहे. रूग्णवाढ रोखण्याची जबाबदारी एकट्या प्रशासनावर टाकून उपयोग नाही तर नागरिकांनीही नियमांची काटेकोर अमलबजावणी करणे आवश्यक आहे मात्र तसे होताना दिसत नाही.
कडक लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस
जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून पोलीस आणि महसूल प्रशासनाने कडक कारवाईची भुमिका कायम ठेवली आहे. पहिल्या दिवशी सातारा तालुक्यात विनाकारण फिरणारांच्या 287 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या तर कराड उपविभागात 367 गाड्या तात्पुरत्या जप्त केल्या. लॉकडाऊनचा दुसरा दिवस उजाडताना पोलिसांनी पुन्हा वाहन तपासणी आणि कारवाईला सुरूवात केली आहे. लॉकडाऊनच्या कडक अमलबजावणीचा रूग्णवाढीवर किती परिणाम होतो यावर प्रशासनाचे पुढील निर्णय अवलंबून असतील.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 5,59,379, एकूण बाधित 1,12254, घरी सोडण्यात आलेले 86,620, मृत्यू 2,610 उपचारार्थ रुग्ण 23011
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात बाधित 2376, मुक्त 2,361, बळी 36