प्राथमिक आरोग्य केंद्रांना २५ डॉक्टर तर ग्रामीण रुग्णांलयाना ५ डॉक्टर
१५०० हून अधिक रेमडेसिवीर इंजेक्शन येणार, आरोग्य संचालक डॉ. संजोग कदम यांनी केले प्रयत्न
प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दूभाव थांबता थांबेना अशी परिस्थिती झाली आहे. त्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी व रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय टीमची गरज नितांत बनली आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी जिल्ह्यासाठी प्राधान्याने लक्ष देवून नव्याने २७ डॉक्टरांची टीम देवू केली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांना २२ डॉक्टर तर ग्रामीण रुग्णांलयाना ५ डॉक्टर मिळाले आहेत. आतापर्यत ६६ डॉक्टर मिळाले असल्याने आरोग्य यंत्रणा भक्कम बनण्यास मदत झाली आहे
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्वच हॉस्पिटल हाऊसफुल्ल झालेली आहेत. ओपीडीही रात्रंदिवस सुरु आहेत. सरकार रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची कमतरता भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरेग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी विशेष लक्ष देवून खास सातारा जिल्ह्यासाठी पाठीमागच्या महिन्यात डॉक्टरांची नियुक्ती केली गेली. आताही नव्याने २२ डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तर ५ डॉक्टर हे ग्रामीण रुग्णालयासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी आरोग्य संचालक डॉ. संजोग कदम यांनी पंधरा दिवसांपूर्वी पुणे येथे बैठक घेतली. त्यानुसार भरती प्रक्रिया राबवून डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील काहीसा ताण कमी झाला आहे.
व्हेंटिलेटर अन् रेमडेसिवीरचाही पुरवठा
कोरोना बाधितांवर उपचारामध्ये कुठेही कसर होवू नये, जिल्ह्यातील रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देता यावी यासाठी आरोग्य संचालक डॉ. संजोग कदम हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांनी १ मे पासून सव्वा नऊ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन साताऱ्याला पाठवून दिले आहेत. तसेच व्हेंटिलेटर पाठवून दिले आहेत. आणखी २० व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
रुग्णांना दर्जेदार सेवा मिळणार
गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त होती. मात्र, शनिवारी एमबीबीएस डॉक्टरांची २७ पदे, तर आतापर्यंत ६६ पदे भरल्यामुळे रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळणार आहे. उपसंचालक स्तरावरुन अधिकाधिक सुविधा जिल्ह्यासाठी देण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी सांगितले.