औंध संघर्ष समिती आक्रमक, बांधकाम विभागाला निवेदन
प्रतिनिधी / औंध
औंध येथे सुरू असलेल्या राज्यमार्गाच्या कामातील अतिक्रमण बांधकाम विभाग व ठेकेदाराने स्टँडलगत ते मुळपीठ यमाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत काढली आहेत. आता तिथे पुन्हा अतिक्रमणे होऊ देऊ नका अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा औंध संघर्ष समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात दिला आहे. रस्त्याच्या रुंदीतील अनियमित तफावत आढळल्याने ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे काम बंद पाडण्यात आले होते. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
निवेदनात म्हटले आहे की, अतिक्रमणे काढून नाला बांधला आहे. आता नवीन नाल्यालगत नव्याने अतिक्रमण करण्यासाठी काही दुकानदार प्रयत्न करीत आहेत. दुकानदारांनी येथे दुकाने न घालण्यासाठी त्यांना समज द्यावी. शासनाच्या नियमानुसार नाल्याच्या बाजूला वृक्षारोपण करावे. त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर आलीम मोदी, वसंत पवार, धनाजी आमले, वसंत गोसावी, चंद्रकांत पवार, संदीप इंगळे, सोमनाथ देशमुख, गणेश चव्हाण, संजय भोसले आदींच्या सह्या आहेत. दरम्यान शनिवारी ठेकेदाराच्या मनमानीपणामुळे औंध संघर्ष समितीच्या सदस्यांनी काम बंद पाडले.