कांदांटी खोऱ्यात भातोसे बंधूंची आधुनिक शेती
कास / वार्ताहर :
तापोळा बामणोलीचा परिसर सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगांनी वेढलेला आहे. उंच डोंगर टेकड्या मोठमोठ्या दऱ्याखोऱ्यांनी व वनसंपदेने नटलेला हा परिसर आहे. लाल माती व तीव्र जमीन उतार असल्याने पावसाळ्यात येथे सर्वाधिक पाऊस पडूनही सर्व पाणी वाहून जाते. जमीनीत पाणी मुरत नाही. या परिसरात पारंपरिक पध्दतीने भात व नाचनीच शेती केली जाते. वर्षभर काबाडकष्ट करुनही पोटाला पुरेल एवढे उत्पन्न शेतीतून मिळत नाही. त्यामुळे तरुण वर्ग नोकरीधंद्यासाठी शहराकडे वळला आहे. परंतू, शिव सागर जलाशयापलीकडील आकल्पे गावचे तरुण सुशिक्षित शेतकरी शशिकांत भातोसे व त्यांचे बंधू भरत भातोसे यांना आपल्या डोंगरकपारीतील जमीनीत हळद, आले ,घेवडा, कोरफड, गवती चहा , बटाटा , चिकू अशी नगदी व औषधी पिके घेऊन आपले उत्पन्न वाढविले आहे.
भातोसे यांनी आपल्या शेत शिवारातील जुन्या विहिरीतील गाळ काढून कावडीने पिकांना पाणी घातले. उन्हाळ्यात सुध्दा ही पिके जगविली यासाठी त्यांना महाबळेश्वर कृषी खात्याकडून आर्थिक सहाय्य मिळाले. या पिकांसाठी त्यांनी कोणतेही रासायनिक खत वापरले नाही. घरच्या व गावातील गाईंचे शेणखत व कीटकनाशक म्हणून गोमुत्र यांचा वापर केला. आदर्श सामाजिक संस्थेने त्यांच्या या उपक्रमास पाठबळ देऊन इतर शेतकऱ्यांनाही प्रेरित केले आहे . त्यांच्या या शेती उपक्रमात त्यांच्या मातोश्री व मुलेही मदत करत आहेत.