सातारा /प्रतिनिधी
सातारा जिल्हय़ाची रूग्णवाढ गेले तीन दिवस पुन्हा 2500 हजारावर पोहोचल्याने कडक लॉकडाऊन असला तरी कोरोनाचा विळखा घट्ट झाल्याचे चिंताजनक चित्र दिसत आहे. प्रशासन अपयशी ठरत असून साताऱयाला सावरण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना यावे लागले आहे. गुरूवारी रात्रीच्या अहवालात 2528 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मृत्यूचे प्रमाण काही प्रमाणात कमी होत आहे. गुरूवारी 30 मृत्यूंची नोंद झाली असून 2053 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सातारा तालुक्याने गेल्या 13 महिन्यात मृत्यूचा 1 हजाराचा आकडा ओलांडला आहे.
रूग्णसंख्येत सातारा तालुक्याची दुसऱया क्रमांकावर घसरण
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2528 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. यात हॉटस्पॉट साताऱयाला दिलासा मिळताना दिसत असून फलटणमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. कालच्या अहवालात हजारावर रूग्ण आढळल्यानंतर शुक्रवारी पुन्हा फलटणमध्ये 1253 रूग्ण आढळले आहेत. तर सातारा तालुका चारशेखाली आला असून 308 रूग्णांची नोंद झाली आहे. सातारा तालुक्याचा मृत्यूचा आकडा शुक्रवारी रात्री 1010 इतका झाला. जिल्हय़ात सर्वाधिक मृत्यू साताऱयात झाले आहेत. त्यानंतर कराड, खटाव तालुक्यातील मृत्यूचा आकडा चारशे ते सहाशेच्या आसपास आहेत. फलटण तालुक्यात रूग्णवाढ वेगाने होत असली तरी त्या तुलनेत रूग्णांच्या मृत्यूवर नियंत्रण आहे.
चार तालुके दोन अंकी
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे- जावली 50 (7314), कराड 172 (21709), खंडाळा 95 (10112), खटाव 167 (15075), कोरेगाव 146 (13787), माण 159 (10912), महाबळेश्वर 39 (3965), पाटण 67 (6502), फलटण 1253 (24311), सातारा 308 (34498), वाई 59 (11356 ) व इतर 13 (1013) असे आजअखेर एकूण 160554 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
साताऱयात 24 तासात 13 मृत्यू
गेल्या चोवीस तासात आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे- जावली 0 (164), कराड 5 (626), खंडाळा 0 (131), खटाव 2 (404), कोरेगाव 2 (309), माण 4 (205), महाबळेश्वर 1 (43), पाटण 1 (156), फलटण 1(245), सातारा 13 (1010), वाई 1 (299) व इतर 0 असे आजअखेर जिह्यामध्ये एकूण 3592 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
2053 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2053 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.