सातारा / प्रतिनिधी :
ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने अर्ज मागे घेण्यासाठी सातारा येथे इच्छुकांनी गर्दी केेली होती. दुपारी 3 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट झाले. तरीही ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका लागल्या आहेत. त्यांच्या पॅनेलच्या उमेदवारांना निवडणूकीचे चिन्ह वाटप सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होते. त्यामुळे छ. शाहु क्रीडा संकुलात तुफान गर्दी होती. वाहतूक शाखेची क्रेन सतत फिरत असली तरीही रस्त्यावर गर्दी झाली होती.
सातारा तालुक्यात 130 ग्रामपंचायती असल्याने आज सकाळपासून अर्ज मागे घेण्यासाठी गावोगावचे नेते आले होते. गाडय़ाच्या गाडया भरुन नेते आल्याने सुरुवातीला जी वाहने आली, ती शाहु क्रीडा संकुलात तर नंतर आली ती वाहने शाहु क्रीडा संकुलाच्या बाजूने रस्त्यावर उभी केली गेली. त्यामुळे दुपारी 12 वाजल्यापासून त्या परिसरात वाहतूक कोंडी सुरु झाली. आतमध्ये तर गर्दीच गर्दी होती.
कोरोनाच्या सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडतोय असे चित्र दिसताच अर्ज मागे ज्यांना घ्यायचा आहे. त्यांनाच आत घेतले जात असले तरीही मलाही सरपंच व्हायचं आहे, अशी म्हणणारे गर्दीनेच आतमध्ये जात होते. त्यामुळे प्रशासनही कोणाला रोखू शकत नव्हते. अगदी बिकट परिस्थिती अर्ज मागे घेण्याच्या हॉलमध्ये झालेली दिसत होती. दुपारी 3 वाजता अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर पुढे जेवण आटोपून कर्मचाऱ्यांनी चिन्ह वाटप सुरु केले.