गोडोली / प्रतिनिधी :
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ कनेक्शन असलेले अनेक ग्राहक पाणी बीलाचे थकबाकीदार आहेत. यात बड्या धेंड्याचा समावेश असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत थकबाकी पाणी बील भरले नाही तर १ मार्चपासून संबंधितांचे कनेक्शन कायमस्वरूपी बंद केले जाणार आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार त्यांच्याकडील थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहा.कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे-चौगले यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
सातारा शहर आणि उपनगरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत लष्कर पाणी पुरवठा केंद्राद्वारे पाणी पुरवठा केला जातो. ग्राहकांना वेळोवेळी निविदेद्वारे जाहीर आवाहन करुन सुध्दा अद्यापही काही थकबाकीदार आहेत. वरिष्ठ कार्यालयाने अशा थकबाकीदारांची नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद करून वसूलीसाठी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या ग्राहकांची पाणी बिल थकबाकी आहे, अशा ग्राहकांनी पाणी बील थकबाकी त्वरीत भरणेबाबत नोटीस देणेत आलेली आहे. नोटीसेप्रमाणे पाणी बील थकबाकीचा भरणा त्वरीत करण्यासाठी दि.28 फेब्रुवारी हि अंतिम तारीख देण्यात आली आहे. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचे नळकनेक्शन कायमस्वरूपी खंडीत करण्याची कार्यवाही दि.१ मार्चपासून सुरू होणार आहे,असे आवाहन जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.