प्रतिनिधी / सातारा :
ताईगडेवाडीमध्ये उभी बाटली आडवी करण्यासाठी मतदान झाले. त्याचा निकाल जाहीर करण्यात यावा, मतदानावेळी गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी सिताई फाउंडेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सिताई फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता कचरे या करत आहेत.
कचरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाटण तालुक्यातील ताईगडेवाडी येथे आडवी बाटली करण्यासाठी मतदान घेण्यात आले होते. मतदान प्रकियेचा निकाल जाहीर करण्यात यावा, एक वर्ष उलटून गेला तरीही निकाल जाहीर केला नाही. या पाठीमागे प्रशासनाची भूमिका काय आहे. हे स्पष्ट होत नाही. एकीकडे महिला सबलीकरणाच्या गोष्टी केल्या जातात. तर दुसऱ्या बाजूला अशाप्रकारे आजही महिलांना न्याय मिळत नसेल तर यासारखे दुर्दैव नाही.