राजकीय आकसापोटी जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप : माजी सरपंच विष्णू साळुंखे
प्रतिनिधी / नागठाणे :
नागठाणे (ता.सातारा) येथील व्यापारी गाळ्यांच्यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोहिते यांनी केलेला आरोप हा केवळ राजकीय स्टंट असून, यातून ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे माजी सरपंच विष्णू साळुंखे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नागठाणे येथे बांधण्यात आलेले व्यापारी गाळे हे ग्रामपंचायतीने न बांधता गावातील गरजू महिला, बेरोजगार युवक, माजी सैनिक व समाजातील इतर घटकांना वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन ग्रामपंचायतीच्या मालकीची मोकळी जागा भाडेपट्ट्याने दिली आहे. या संदर्भात वर्तमानपत्रातून व गावच्या सार्वजनिक नोटीस बोर्डवरून याची कल्पना ग्रामस्थांना देण्यात आली होती. तसेच या संदर्भात वेळोवेळी मासिक सभेतही याबाबत चर्चा करून ग्रामस्थांच्या सूचनांचा विचार करून तसे ठराव करून वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आले आहेत.
मागणी अर्जाप्रमाणेच व शासनाच्या नियमांना आधीन राहून मोकळ्या जागेचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने फक्त मोकळी जागा वितरित केली असून संबंधितांनी स्वखर्चाने बांधकाम करून गाळे उभे केले आहेत. ग्रामपंचायतीचा फक्त भाडे घेणे एवढाच संबंध असून, कोणत्याही गाळेधारकाकडून ग्रामपंचायतीने कोणतीही रक्कम घेतली नाही. जि. प.सदस्या भाग्यश्री मोहिते यांनी गाळेधारकांकडून तीन लाख रुपये घेतल्याचा आरोप हा हास्यास्पद व बिनबुडाचा आहे. उलट या गाळ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीस मोठ्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत मिळाले आहे,असेही त्यांनी म्हटले आहे.