प्रतिनिधी / नागठाणे
कोरोना साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत नागठाणे (ता.सातारा) येथील व्यापाऱ्यांकडून मंगळवारपासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. या जनता कर्फ्यूला येथील ग्रामस्थांमधून उत्स्फूर्त पाठींबा भेटला आहे.
केंद्र व राज्य सरकारने मिशन बिगीन अगेंनची घोषणा केल्यानंतर सातारा जिल्ह्यात टप्प्याटप्याने अनलॉक सुरू झाले होते. महामार्गावरील नागठाणे हे बाजारपेठेचे प्रमुख गाव असल्याने येथेही सर्व प्रकारची दुकाने उघडण्यात आली होती. नागठाणे गावाशी परिसरातील अन्य गावांचा मोठ्या प्रमाणात संपर्क असल्याने येथील बाजारपेठ रोजच गजबजत होती. त्यामुळे सोशल डिस्टगसिंगचा फज्जा उडाला होता. अनेक लोक विनामास्कचे फिरताना आढळत होते. त्यामुळे नागठाणे गावात कोरोनाग्रस्त रुगणांची संख्या रोजच वाढत होती.
नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना साथरोग सुरू झालेपासून आज अखेरपर्यंत ३५० रुग्णांची नोंद झाली आहे. नागठाणे गावातच आज अखेर ८० कोरोना बधितांची नोंद झाली आहे.त्यामुळे गावात रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये , यासाठी येथील व्यापारी वर्गाने दहा दिवसांचा जनता कर्फ्यु सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या जनता कर्फ्युला मंगळवारपासून सुरुवात झाली. गावातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. ग्रामस्थही उत्स्फूर्तपणे या जनता कर्फ्युत सहभागी झाले आहेत.