व्यापारी, ग्राहकांनी नियम पाळणे बंधनकारक
प्रतिनिधी / नागठाणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यापासून बंद असलेला नागठाणे (ता.सातारा) येथील आठवडा बाजार सुरू करणार असल्याची माहिती सरपंच विष्णू साळुंखे यांनी दिली. मंगळावर दि. ३ नोव्हेंबरपासून हा आठवडा बाजार पूर्ववत भरणार आहे.
मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव देशासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पसरू लागल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. यामुळे नागठाणे येथील आठवडा बाजारही त्यावेळेपासून बंद ठेवण्यात आला होता. सुमारे सात महिने हा आठवडा बाजार बंद होता.
सध्या सर्वत्र टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे नुकतेच जिल्हा प्रशासनाने बंद असलेले आठवडा बाजार पुन्हा नियम पाळत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानव्ये सात महिन्यांपासून बंद असलेला नागठाणेचा आठवडा बाजार मंगळवार ३ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे.
मात्र, या आठवडा बाजारात सहभागी होणाऱ्या व्यापारी, ग्राहक व ग्रामस्थांना शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या व्यापारी वर्गाने, ग्राहकांनी सामाजिक अंतर राखून व्यवहार करावेत. सर्वाना मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. तसेच सॅनिटायझरचा वापरही वेळोवेळी करणे बंधनकारक आहे. बाजारात कोणीही वाहने आणू नयेत. सामाजिक अंतर न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांकडून १००० रुपये तर विनामास्क आढळल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सरपंच विष्णू साळुंखे यांनी दिली.