प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हा परिषदेने या वर्षी ही पंचायत राज सशक्तीकरण अभियानमध्ये दिल्ली दरबारी झेंडा फडकवला आहे. त्या पुरस्काराचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पध्दतीने करण्यात आले. या पुरस्काराचा स्वीकार जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते आदी मान्यवरांनी स्वीकार केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक केले.ग्रामपंचायत बळकटीकरणासाठी केंद्राकडून भरघोस मदत दिली जात असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रीय पंचायत राज दिवसानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पध्दतीने सातारा जिल्हा परिषदेचा पंडित दिनदयाळ उपाध्याय पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. हा सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, किरण सायमोते, देगाव(ता. वाई) आणि मान्याचीवाडी (ता. पाटण)चे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.पुरस्काराचे स्वरूप जिल्हा परिषदेसाठी 50 लाख रुपये आणि सन्मान चिन्ह तर ग्रामपंचायतीना आठ लाख रुपये असे होते.या पुरस्काराचे वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायत व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले गेले आहेत.गाव सक्षम झाले तर देश सक्षम होईल यासाठी गावांना पंचायत राज व्यवस्था बळकट केली जात आहे.सातारा जिल्हा परिषदेचे कार्य चांगले आहे.असेच काम करत रहा माझ्या शुभेच्छा आहेत, असे त्यांनी सांगितले.
पुरस्काराची रक्कम लगेच खात्यावर जमा
सातारा जिल्हा परिषद आणि पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी व वाई तालुक्यातील देगाव या गावांना ऑनलाईन पुरस्कार प्रदान करताच लगेच पुरस्काराची रक्कम त्या गावच्या आणि जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात आली.