जणावरांसह माणसांचे आरोग्य धोक्यात
प्रतिनिधी / वाई
पांडे-खानापूर लगतच्या शेतकर्याने स्वतःच्या शेतात दहा बारा टँकर मळीयुक्त रसायन टाकल्याने येथील शेतजमीन व हवामान प्रदुषीत झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरून हजारो माशांनी थैमान घातले आहे. यामुळे वस्तीवर राहणार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच विहिरीतील पिण्याचे पाणी या घातक रसायनामुळे दुषीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे माणसांचा जणावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना त्यामुळे पायपीट करण्याची वेळ येणार आहे. याची तक्रार भुईंज पोलीस ठाणे व सातारा येथील प्रदुषण नियंत्रक मंडळाकडे दाखल झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाई तालुक्याच्या पूर्व भागातील पांडे आणि खानापूर हद्दीलगत असणार्या दिलीप नथूराम चव्हाण यांच्या मालकीची जमीन व पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. या विहरीच्या पश्चिमेच्या बाजूस संतोष घाटे यांची शेतजमीन असून त्यात त्यांनी दहा ते बारा मळीचे टँकर 11 मार्च 2021 रोजी टाकले आहेत. या रसायनावर दिवसेंदिवस पडत असलेली उन्हाची तापीमुळे विषारी वायु तयार होवून हवेच्या प्रवाहाबरोबर परिसरामध्ये फिरत असल्याने तेथील वस्तीवर राहणार्या नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या परिसरामध्ये मोठया प्रमाणात माशांचे थवे घोंघवताना दिसत आहेत. मळीचे हे रसायन दुर्गंधीयुक्त असल्याने येथील रहिवाशांना श्वास घेताना मोठया प्रमाणात त्रास होवू लागला आहे.
शेतीला पाण्याची व पिण्याच्या पाण्याची लगत असलेली विहीर परिसरात अचानक पाऊस पडल्यास रसायनाचे पाणी थेट पिण्याच्या पाण्यामध्ये उतरणार आहे. यामुळे दिडशे ते दोनशे वस्तीवर असणारी जनावरे आणि पिण्यासाठी उपयोग करणारे लोक यांनी हे पाणी पिल्यास जनावरे व माणसांचे आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. याची कल्पना लगतचे शेतकरी संतोष घाटे यांना असूनही ते जनावरांच्या व माणसांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत.
तसेच सातारा येथील प्रदुषण महामंडळ या खात्यासही त्यांनी अर्जाव्दारे कळविले होते. त्याची गंभीर दखल घेवून प्रदुषण महामंडळाच्या अधिकारी वर्गाने काल दि. 13 रोजी पांडे-खानापूर हद्दीत असलेल्या तक्रारदार यांच्या शेतावर येवून प्रत्यक्ष पाहणी करून घडल्या प्रकाराची माहिती घेतली. त्यावर त्यांनी घाटे यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. परंतू भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस काय कारवाई करणार याकडे कवठे ग्रामस्थांसह तक्रारदार दिलीप चव्हाण हे डोळे लावून बसले आहेत.