वृक्षप्राधिकरण समितीने कारवाई न केल्यास रिपाइं छेडणार आंदोलन
सातारा / प्रतिनिधी :
पाचगणी या थंड हवेच्या शहरात अनेक उबदार घोळाचे प्रकार घडत असतात. त्यापैकीच एक म्हणजे नैसर्गिक साधन संपतीचा ऱ्हास काही बडे मंडळी करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हॉटेल समर प्लाझा येथे मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करण्यात आली आहे. ही झाडे तोडताना वृक्ष प्राधिकरणाने डोळे झाक केली कशी?, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पाचगणीत चौकात रिपाइंच्या स्टाईलने अनोखे आंदोलन केले जाईल, असा इशारा रिपाइंचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अमित मोरे यांनी दिला आहे.
मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पाचगणी शहरालगत नैसर्गिक साधनसंपती आहे. त्या साधन संपतीचा ऱ्हास काही मंडळी जाणीवपूर्वक स्वतःच्या फायद्याकरता करत आहेत. झाडांची तोड करुन पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. पाचगणी येथील समर प्लाझा या हॉटेलकडून मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करण्यात आली आहे. त्यांनी ही झाडे विना परवाना तोडली आहेत. अशी जर तोड प्रत्येकांनी केली तर पाचगणी शहर भकास दिसू लागेल.
प्रामुख्याने निसर्गाची हानी करणाऱ्या अशा समाजकंटकांवर झाडाच्या वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, संबंधितांकडून तडजोड न करता त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा पांचगणीतल्या चौकात रिपाइं स्टाईलने रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोरे यांनी दिला आहे.