सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहराच्या हद्दवाढीत गोडोली, विलासपूर, गोळीबार मैदान, शाहुनगर, चार भिंती, बॉम्बे रेस्टॉरंट, विसावा नाका, जरंडेश्वर जकातनाका हा परिसर आलेला आहे. त्या परिसरात गेल्या तीन महिन्यापासून सुविधांची वाणवा आहे. तीन महिन्यापासून घंटागाड्यांची बीले दिली नाहीत. पथदिव्यांचे बील न दिल्याने रस्त्यावर अंधार असतो. प्राधान्याने हे प्रश्न सोडविण्यात यावेत, अशी मागणी आमदार शिवेंद्रराजे मित्र समुहाच्यावतीने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सोयी सुविधापासून भाग वंचित राहणार नाही. प्रत्यक्ष विलासपुर येथे मी भेट देईन, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी फिरोज पठाण, मिलिंद कदम, नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे, राजू गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सातारा पालिकेच्या हद्दवाढीमध्ये विभागातील त्रिशंकू भागाची न घर का ना घाट का अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागातील नागरिकांच्या पाणी, वीज, रस्ते, गटर व कचरा या सर्व मूलभूत गरजा याची जबाबदारी पालिकेकडे गेल्यामुळे परिसरातील मुलभूत सोयी सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. हद्दवाढ झालेल्या भागातील प्रत्येक ठिकाणी जागोजागी तसेच विलासपुर ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिग साचू लागले आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. निर्माण होणाऱ्या कचऱ्याची रोजच्या रोज विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याने पालिकेने रोजच्या रोज कचरा उचलण्याची व्यवस्था करावी. घंटागाडय़ा सुरु कराव्यात. महामार्गाच्या सर्व्हीस रोडच्या दुरावस्थेबाबत महामार्ग प्राधिकरणाकडे आवश्यक तो पाठपुरावा करावा.
रस्त्याला वीज नसल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील प्रमुख चौकात वीज व्यवस्थेबरोबरच साईबाबा मंदिर ते शिवराज पेट्रोल पंप इंदिरानगर येथील स्ट्रीट लाईट तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे. तसेच साताऱ्याला ऐतिहासिक वारसा आहे. शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या ऐतिहासिक भूमितील पूर्व भागातील म्हणजेच विलासपुर, गोडोली, शाहुनगर भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, याचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी केली आहे.
हद्दवाढ व त्रिशंकू भागातील नागरिकांची घरपट्टी, कर आकारणी पालिकेकडे जमा होणार असल्याने सर्व नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा पुरवणे ही पालिकेची जबाबदारी आहे. सुविधा मिळवण्याचा नागरिकांचा हक्क आहे. नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन पालिका प्रशासन नागरिकांचा हक्कच हिरावून घेणार असेल तर आमच्या विभागातील सुज्ञ नागरिक कदापिही गप्प बसणार नाहीत. अगोदरच पालिकेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात नागरिकांच्यात संतापाचे वातावरण आहे. त्यात आमच्या हक्काच्या सोयीसुविधा देण्यास पालिका टाळाटाळ करत असेल तर पालिकेच्या विरोधात मोठे जनआंदोलन करु असा इशारा दिला आहे.