प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेच्या येवू घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी होईल की नाही हे आताच आपण सांगू शकत नाही. वरिष्ठ पातळीवर ठरेल तेव्हा ठरेल परंतु सर्वच जागा लढवण्याची तयारी शिवसेनेकडून करुयात आणि सातारा शहरातील 48 जागा लढवून पालिकेवर भगवा फडकवणारच. मंत्री म्हणून मी वाट्टेल ती मदत करतो, अशी सिंहगर्जना राजेंच्या साताऱयात उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. दरम्यान, एका महिन्यात शहरात प्रत्येक वॉर्डात एक शाखा सुरु झाली पाहिजे, असेही त्यांनी सुनावले.
शिवसेनेच्या देवज्ञ मंगल कार्यालयातील आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपनेते नितीन बानूगडे-पाटील, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा संघटिका शारदा जाधव, माजी आमदार सदाशिव सपकाळ, उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, सातारा तालुका प्रमुख दत्ताभाऊ नलावडे, तालुका प्रमुख अनिल गुजर, आतिष ननावरे, विश्वनाथ धनावडे, सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, निलेश मोरे, उपशहरप्रमुख गणेश अहिवळे, शहर संघटिका मंजिरी सावंत, युवा सेनेचे तालुका प्रमुख महेश शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत म्हणाले, आजच्या मेळाव्याला गर्दी तर आहेच शिवाय ते दर्दीपण आहेत. माझ्या मंत्रीपदाचा उपयोग सातारा शहरातील शिवसेना वाढवण्यासाठी निश्चित करेन. पालिकेच्या 48 जागा आहेत. लोकसभेला, विधानसभेला दहशत माजवणारे सगळे तिकडे आहेत. त्यांच्यापेक्षा आपण विकासाची रेघ मोठी मारली तर आपल्या बाजूने जनतेचा कौल होईल. मुख्यमंत्री साहेबांनी चांगलं काम केले आहे. महाराष्ट्रात नुसते अनेकांच्या हृदयातच मुख्यमंत्री नाहीत तर त्यांच्या नावाचे पॅनेलही निवडून आलेले आहे. एवढी चांगली प्रतिमा राज्यात तयार झाली आहे. विधानसभानिहाय बैठका लावा मी येणार आहे. पक्षासाठी चोवीस तास उपलब्ध असलेले संपर्कप्रमुख म्हणून नितीन सर तुम्हाला लाभले आहेत. धनुष्यबाणांची निशाणी सातारकर स्वीकारतील. त्याकरता केवळ आरंभ शूळ असुन चालणार नाही. वॉर्ड तेथे शाखा सुरु करा. घरोघरी शिवसैनिक तयार झाला पाहिजे. एक महिन्यात मी पुन्हा येईन. तेव्हा मला जास्तीत जास्त शाखा सुरु झालेले फलक दिसले पाहिजेत.
या साताऱयात शिवसेनेचा डंका झाला पाहिजे. आपलं केलेलं काम घराघरात गेलं पाहिजे. त्याचे पुस्तिका काढून घराघरात पोहचवा. कुठं तरी सिस्टीममध्ये काम करुयात. टीम मोहीम राबवा. तिकीट कोणाला द्यायची हे साहेब बघतील आमच्यासोबत असलेले आघाडीतील दुबळे समजत असतील तर स्वबळाची तयारी करायची आहे, सातारा नगरपालिका ही निवडणूक कठीण नाही, नुसता संकल्प करून नाही, पुरा करण्यासाठी प्रयत्न करा. नगरपालिकेचे ज्यांना तिकीट हवं असेल त्यांनी काम केले पाहिजे. सगळ्या पदाधिकाऱयांनी भक्कम पाय रोवून काम केले पाहिजे. जे जे लागेल ते सहकार्य करु. अन् सातारा पालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला करुयात, असे त्यांनी सांगितले.
उपनेते नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुरुवात करणे हा आहे. महाराष्ट्राला योग्य वेळी योग्य नेतृत्व मुख्यंमत्री उध्दव ठाकरे यांच्या रुपाने मिळाले आहे. त्यांनी संकटाची मालिका पेलून धरली आहे. महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिह्यातील नगरपालिकांना झुकते माप दिले आहे. आपलेच मंत्री करत असलेले काम आपल्याला सांगता येत नाही, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता येत नाही तोपर्यंत शिवसेनेचे काम सांगता येत नाही. सातारा शहरात समर्पक पर्याय दिला जाईल. सातारा शहरात शिवसेनेचा भगवा फडकेल, असे त्यांनी सांगितले. शारदा जाधव, यशवंतराव घाडगे, सचिन मोहिते, बाळासाहेब शिंदे यांनी आपली मते व्यक्त केली. तर स्वागत बाळासाहेब शिंदे, निलेश मोरे यांनी केले. प्रास्ताविक सचिन मोहिते यांनी केले.