टोल प्रश्नी आणि महमार्ग खड्डे प्रश्नी खड्डयात बसून आंदोलनाचा इशारा, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आनंदोलन न्यास झाले आक्रमक, अजंठा चौकात ब्रिजवर भलामोठा खड्डा, रात्रीचा प्रवास धोक्याचा, काहीं ठिकाणीच स्ट्रीट लाईट
सातारा / प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे मुजवून घेण्यासाठी प्रशासन काहीच हालचाल करत नाही. पेव्हर ब्लॉकने खड्डे भरून आणखी अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. महामार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे मंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, खड्डे आणि टोलमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याच्या निषेधार्थ खड्यात बसून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ‘अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआनंदोलन न्यास संघटक’ शशिकांत जाधव यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा सध्या खड्डयांचा महामार्ग आहे. एखादा पाणंद रस्ता ही चांगला या महामार्गापेक्षा असतो. बैलगाडीसुद्धा या महामार्गावरून नीटशी जाणार नाही तर वाहनाचे काय?, अश्या खड्ड्यांमुळे आलिशान वाहनांना ही आपले पार्ट निकामी करावे लागत आहेत. शेंद्रे ते सातारा आणि सातारा ते आनेवाडी टोल नाका, आनेवाडी टोल नाका ते शिरवळ या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या लेनमध्ये खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे रस्ते प्राधिकरणाने पेव्हर ब्लाकमध्ये खड्डे भरले आहेत. त्यामुळे आणखीन अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. दुचाकी व आलिशान चार चाकी वाहनाच्या चाकांचा आउट निघत आहे. रात्रीच्या वेळी तर वाहन चालवणे धोक्याचे बनले आहे.असे पडलेले खड्डे असताना ही टोल वसुली मात्र केली जात आहे. लोकांच्या जीवाशी खेळून टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार इथे सुरू आहे. या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ महामार्गावरील खड्यात बसून आंदोलन करणार असल्याचे अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आनंदोलन न्यास संघटक शशिकांत शिवाजी जाधव यांनी सांगितले.