● भांडाफोड झालेल्या ‘आरे-कारी’ प्रकरणाच्या चौकशीचा फार्स, ● चुका मान्य करुन दुरुस्त्या करा
दीपक प्रभावळकर / सातारा :
कोरोना अपलोड घोटाळा मान्य करुन केवळ फार्स करणाऱया जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन उठवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज होती. मात्र कागदावरचे आकडे दाखवून जिल्हा कोंडणाऱया प्रशासनाला जागे करण्यासाठी तरुण भारतला भांडाफोड करावा लागला. घोटाळय़ाच्या हिमनगाचे टोक म्हणून ‘तरुण भारत’ने आरे-कारी प्रकरण जनतेसमोर आणले. कोणताही चिमुकला आयसीएमआरच्या वेबसाईटवरुन जाऊन सूर्यासारख्या खडखडीत भांडाफोडची खातरजमा करु शकतो. मात्र चुकांची दुरुस्ती करण्यापेक्षा चौकशीचा फार्स करणे सुरू आहे. थोडक्यात जिल्हा प्रशासन कंदील घेऊन सूर्याचा शोध घेत असल्यासारखाच प्रकार आहे.
सातारा जिल्हय़ात कोरोना बाधितांचे आकडे त्याचवेळी अपलोड न केल्यामुळे मे महिन्याच्या उत्तरार्धात अपलोड घोटाळा झाला. कदाचित पॉझिटीव्हीटी रेट फुगल्याने जिल्हय़ावर पुन्हा लॉकडाऊन लागला. हा केवळ आकडय़ांचा खेळ होता. पण कागदावरच्या या खेळापोटी जिल्हय़ाचा गळा घोटला गेला. ‘तरुण भारत’ने जिल्हा प्रशासनातील उच्च अधिकाऱयांना आठ दिवस आधी याबाबतची सातत्याने विचारणा केली होती. मात्र याकडे जिल्हय़ाचे लक्ष वेधले जात असल्याने ‘तरुण भारत’ला आकडय़ांचा घोळ जनतेपुढे आणावा लागला.
म्हणून ‘आरे कारी’ प्रकरण जनतेपुढे आणले
झाल्या चुका दुरुस्त करण्याऐवजी प्रशासन लक्ष वेधत असल्याने तरुण भारतला सातारा तालुक्यातील आरे कारी प्रकरण जनतेपुढे आणावे लागले. वास्तविक आरे-कारी प्रकरण हे हिमनगाचे टोक असल्याचे तरुण भारतला आलेल्या हजारो प्रतिक्रिया व वाचकांनी सांगितलेल्या वस्तुस्थितीहून दिसत आहे.
‘तरुण भारत’ने केलेली पूर्णतः शहानिशा
आरे-कारी प्रकरणी तरुण भारतने ग्रामस्तरीय समित्या, आरोग्य विभाग आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय संस्था असलेल्या आयसीएमआरसह साऱयांची खातरजमा केली होती. गुरुवारी दि. 4 जूनच्या अंकात भारतात पहिल्यांदाच बाधितांच्या नावासह आयसीएमआर नंबरचा वापर करुन पहिल्यांदाच वार्तांकन करण्यात आले. हे वृत्त कोणतेही बालक (ऑनलाईन शाळेमुळे स्मार्ट झालेले) याची पडताळणी करु शकते. तर मग जिल्हा प्रशासनातील क्लास वन, क्लास टू अधिकाऱयांना हे शक्य नव्हते का?
सूर्य शोधायला कंदील का हवाय?
‘तरुण भारत’चे वृत्त आशा स्वयंसेविका ते आयसीएमआर या पातळय़ांवर खडखडीत सत्य आहे. तरी जिल्हा प्रशासनाला प्रांताधिकाऱयांच्या खांद्यावर बंदूक ठेवावी लागली. यानंतर प्रांताधिकाऱयांनी दोन पानी चौकशीचे आदेश काढले. या साडे एकोणीस ओळींच्या चौकशी आदेशात अठरा ओळी ‘तरुण भारत’चे वृत्त असून यानंतर ‘या अनुशंगाने आपला खुलासा सत्वर या कार्यालयासस सादर करावा. यामध्ये कोणतीही हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी’, अशी अवघ्या दीड ओळीचा आदेश काढण्यात आलेला आहे. हा आदेश तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नावे निघालेला आहे. आता हे त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या मंडल अधिकारी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी यांच्या नावे काढून पुढे कंदीलाची पणती होवू नये म्हणजे झालं. विशेष म्हणजे निघालेल्या चौकशी आदेशावर ‘तत्काळ आपत्ती व्यवस्थापन’ असा लाल रंगाचा शिक्काही मारण्यात आला आहे.
-दीपक प्रभावळकर 9325403232, 9527403232