प्रतिनिधी / सातारा
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्याना आर्थिक दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा फलटण च्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक दिवसाचे वेतन कपात करण्याची विनंती निवेदनाद्वारे नायब तहसीलदार आर. आर. पाटील यांचेमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच आमच्या फलटण तालुक्यातही कमी दाबाच्या निर्माण झालेल्या पट्टयामळे प्रचंड अतिवृष्टी झाली. यामुळे कांदा, डाळिंब, द्राक्ष पपई, ऊस, मका, बाजरी इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे आधीच कोरोनामुळे प्रचंड आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी प्रचंड कोलमडून पडला आहे. आता आपला बळीराजा शासकीय मदतीशिवाय उभा राहणे अशक्य आहे. कोविड १९ संकटातही कोल्हापूर येथे शिक्षक संघाने स्वतंत्र असे कोविड सेंटर उभे करून देशात एक आगळे वेगळे उदाहरण निर्माण केले. तसेच लॉकडाउन काळात प्रति शिक्षक 1 जीवनावश्यक किट पंचायत समिती फलटण यांच्या आवाहनानुसार तालुक्यात गरजू लोकांना दिले होते. पूर्ण राज्यामध्येही शिक्षक संघाने आपापल्या स्थानिक पातळीवर मदत केली आहे.
सांगली- कोल्हापूर पूरग्रस्तांना ही फलटण तालुक्यातील शिक्षकांनी ग्रामस्थ विद्यार्थी पालक पदाधिकारी प्रशासन यांच्या साहयाने मोठी मदत उभी करून नागठाणे(पलूस)सांगली येथे पूरग्रस्त ना दिली होती. प्रत्येक आपत्तीत शिक्षक संघ मदतीस नेहमीच अग्रेसर असतो. यास्तव आत्ताच्या या अस्मानी संकटातही शेतकऱ्यांस मदत म्हणून आमचे एक दिवसाचे वेतन कपात करावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघाचे जेष्ठ नेते लालासो भोसले, तालुका नेते संतोष निंबाळकर, तालुका अध्यक्ष संतोष कदम, सरचिटणीस देवदास कारंडे, न. प. प्रतिनिधी अजित गायकवाड यांची उपस्थिती होती.