विशाल कदम/ सातारा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ दिवसेंदिवस अधिकच गर्तेत जावू लागले आहे. महामंडळाचे जेवढे राज्यात डेपो आहेत. त्या डेपोंची आणि अधिकाऱयांच्या कार्यालयांची स्वच्छता करण्याचा ठेका ब्रिक्स या कंपनीला दिला गेला होता. डिसेंबर महिन्यामध्येही या कंपनीने हात झटकले अन् सफाई कामगार वाऱयावर लटकले. सफाई कर्मचाऱयांनी दि. 18 जानेवारीपासून काम बंद केले आहे. त्यामुळे दररोज एक ट्रालीभर निघणारा कचरा आता बसस्थानकाच्याच आवारात पडून राहू लागला आहे. जिह्यातील ब्रिक्स कंपनीच्या 130 कर्मचाऱयांनी काम बंद केल्याने हा कचरा साठून राहिला आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱयांसह कर्मचाऱयांचे केबीनमध्येही कचराच कचरा दिसत आहे. कर्मचारी व प्रवाशी आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरगावावरुन येणारे प्रवाशी तर आपोआपच सातारा आला रे रुमाल काढा रे नाक बांधा रे, अशी सूचना करताना दिसू लागले आहेत.
गेल्या दोन वर्षापुर्वी राज्यात जेवढी बसस्थानके आहेत. त्या बसस्थानकांची आणि बसस्थानकातील अधिकारी, कर्मचाऱयांची निवासस्थाने स्वच्छ करण्याकरता ब्रिक्स या कंपनीला ठेका दिला होता. कंपनीच्या कर्मचाऱयांना महिन्याला 8 हजार 100 इतका पगार देवून झाडलोट केली जात होती. सातारा आगारात 12 कर्मचारी दोन शिप्टमध्ये झाडलोट करुन सगळा आगार, विभागीय कार्यालय, कर्मचारी निवासस्थान आदी ठिकाणीची झाडलोट केली जात असे. दिवसरात्र हे काम सुरु असायचे. महामंडळ चांगले चालण्याऐवजी डबघाईलाच येताना दिसत असल्याचेच चित्र या कर्मचाऱयांच्या थकवलेल्या पगारांमुळे वाटू लागले आहे. सातारा जिह्यातील 11 आगारात 130 कर्मचारी कार्यरत होते. तब्बल सातारा विभागाकडून कंपनीला साडेतीन कोटी रुपये येणे असून पैसे महामंडळाकडून दिले गेले नसल्याने दि. 18 जानेवारीपासून काम बंद ठेवण्यात आले. महामंडळाच्या अधिकाऱयांना हे माहिती आहे पण त्यांच्याकडून कोणतीही हालचाल झाली नाही. उलट साठतोय कचरा तर साठू द्या, अशीच भूमिका ठेवत त्याबाबत काहीच कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळे बसस्थानकात कचऱयाचे ढिग साठू लागले आहेत. प्रवाशांबरोबर कर्मचारी आणि अधिकाऱयांनाही मच्छरांचा त्रास होवू लागला आहे. साथीचे रोग निर्माण होण्याची शक्यता आहे.
शौचालयाच्या पाठीमागे ड्रेनेज उघडय़ावर वाहते
बसस्थानकात सार्वजनिक शौचालय आहे. हे शौचालय तसे पालिकेच्या अखत्यारित येते. परंतु या शौचालयाच्या पाठीमागे ड्रेनेजची पाईपला गळती लागली आहे. सगळे गटर उघडय़ावर असल्याने दुष्काळात तेरावा महिना होत आहे.
मच्छर घालवणाऱया कॉईलंना मोठी मागणी
बसस्थानक व विभागीय कार्यालयात झाडलोट होत नसल्याने अधिकाऱयांनी आपल्या खुर्चीशी कशीतरी धुळ झटकत कामकाज करण्याकरता मच्छरविरोधी कॉईल आणून लावली जात आहे. त्यामुळे नजिकच्या दुकानांमधून मोठय़ा प्रमाणावर या कॉईलची मागणी होताना दिसत आहे.