केवळ दोनच जणांनी मूर्ती आणण्याचे पालिकेचे निर्देश, आगमन मिरवणुकाना मनाई, ऑन लाईन नोंदणीत 70 गणेशोत्सव मंडळांनी केली नोंदणी, हरतालिका उपवासाला फळे महागली, साधेपणाने यावर्षी बाप्पांचे होणार आगमन
सातारा / प्रतिनिधी :
संकटहर्ता- विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे आगमन उद्या होणार आहे. कोरोनाचे संकट असल्याने अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार यावर्षी बाप्पांच्या स्वागताला ना बँड ना ताशा ना ढोल केवळ दोनच जणांनी मूर्ती आणायला जायचे असे पालिका प्रशासनाने सूचना दिल्या होत्या. त्याकरता मूर्ती आणायला स्टॉलवर सोशल डिस्टनन्स ठेवून गर्दी दिसत होती.
आज हरतालिका उपवासाचा दिवस असल्याने बाजारात फळे महागली होती. केळी 50 ते 60 रुपये डझन, सफरचंद 150 रुपये किलो असा दर आहे. महिलांनी हरतालिका उपवास करून पूजन केले. पालिकेकडे ऑनलाईन नोंदणी केवळ 70 सार्वजनिक गणेश मंडळांनी यावर्षी केली आहे.
कोरोना महामारीचे संकट आले असून या संकटाचे विघ्न टळू दे अशी प्रार्थना गणेश भक्तांकडून बाप्पांच्या चरणी आतापासूनच केली जात आहे. यावर्षी कोणताही सण, उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. अशा वातावरणात संकट मोचक गणपती बाप्पाचे आगमन दि.22 रोजी उद्या सकाळी ०९:३० पासून ते सायंकाळी ०७:४५ पर्यंत मुहूर्तावर होत आहे. परंतु प्रशासनाने मुहूर्त पाळू नका, गर्दी करू नका, मूर्ती आणून प्रतिष्ठापना करा असे आवाहन केले आहे. त्यानुसार सातारा शहरात शुक्रवारी सकाळपासून मूर्ती नेण्यासाठी गणेश भक्तांची गडबड सुरू होती. सोशल डिस्टनन्स पाळून सर्वच ठिकाणी गर्दी दिसत होती.
दरम्यान,दरवर्षी वाजतगाजत येणार्या बाप्पांचे यावर्षी अतिशय साधेपणाने आगमन होण्यास सुरुवात झाली होती