दरवर्षी 3 हजार मुलांना शालेय मदत
24 तास कार्यरत असणारी सेवा
गौरी आवळे / सातारा
‘चाईल्ड लाईन’ ही भारत सरकारच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शून्य ते 18 वयोगटातील मुलां-मुलीकरिता मोफत चालवली जाणारी सेवा आहे. व्यसनमुक्ती, बालमजुरी, बालविवाह, बाल भिक्षेकरी, लैंगिक शोषण अशा अनेक क्षेत्रांमध्ये चाईल्ड लाईन 24 तास कार्यरत असते. यासाठी 1098 हा क्रमांक डायल करावा. दरवर्षी सातारा जिल्ह्यात तीन हजार मुलांना चाईल्ड लाईन मार्फत शालेय मदत पोहचवली जात असल्याची माहिती प्रोजेक्ट डायरेक्टर सुधीर तुपे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.
बालविवाहचे प्रमाण जास्त असल्याने ‘चाईल्ड लाईन’ ने गेल्या 8 वर्षात 538 बालविवाह थांबवले आहेत. या कामात महिला व बालकल्याण विभाग सातारा, बालकल्याण समिती सातारा, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस निरीक्षक यांच्या मदतीने हे कार्य पार पाडले जाते. सन 2018-2019 या कलावधी मध्ये 43 बालविवाह थांबविण्यात आले आहेत. या प्रसंगी लोकांच्या रोशाला ही सामोरे जावे लागते. परंतु पोलीस सोबत असल्याने बालविवाह थांबविणे सोपे जाते.
गेल्या वर्षात 410 बालकामगारांची मुक्तता करण्यात आली. 352 मुलांना वैद्यकीय मदत करण्यात आली. 120 मुलांना बालकल्याण समितीच्या मदतीने बालगृहामध्ये आश्रय देण्यात आला. लॉकडाऊनमध्ये लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट व ‘चाईल्ड लाईन’च्या मदतीने 3 हजार 500 मुलांना आहार देण्यात आला आहे. 147 मुलांना गेल्या वर्षात समुपदेशन करून अडचणीतून बाहेर काढले आहे. शारीरिक आणि लैंगिक अत्याचार झालेल्या 67 मुलांची यातून सुटका करण्यात आली. गेल्या वर्षभरात सातारा जिह्यातील 26 शाळांमध्ये जाऊन 22 हजार शालेय मुलांना ‘चाईल्ड लाईन’विषयी माहिती पोचवण्यात आली आहे.
24 तास कार्यरत असलेल्या चाईल्ड लाईन प्रकल्पामुळे काळजी व स्वरक्षणची गरज असलेल्या अनेक मुलांना आपापल्या घरी पाठविले आहे. चाईल्ड लाईनने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, मुले स्वखुशीने रस्त्यावरचे जीवन पत्करत नाहीत. तर आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीचे बळी असतात असे तुपे यांनी सांगितले.