संबंधितांवर कारवाई करण्याचे मंत्री देसाई यांनी दिले आश्वासन
सातारा / प्रतिनिधी :
शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देतो, अशी बतावणी करुन सन 2010 मध्ये त्यांच्या कागदपत्रावर कर्ज घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांना वनटाईम सेटलमेंट करा, अशी बँकेची नोटीस आल्याने पीडित शेतकऱ्यांनी आज राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आपली कैफियत मांडली. संबंधित प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. दरम्यान, तारळे भागातील त्या पुढाऱ्यांची आता ही कारवाई टाळण्यासाठी पळापळ सुरु झाली आहे.
एरंडाच्या झाडांसाठी शासनाचे अनुदान मिळते आहे. तुमची कागदपत्रे द्या, अशी बतावणी करुन तारळे भागातील पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून त्यांच्या कागदपत्रावर कर्जे उचलली. ती कर्जे शेतकऱ्यांनी घेतली नसल्याने त्यांना जेव्हा वसुलीच्या नोटीसा मिळाल्या तेव्हाच माहिती पडले. तात्कालीन महाबँकेच्या तारळे शाखेच्या शाखाधिकाऱ्यांना हाताशी धरुन शेतकऱ्यांची फसवणूक तारळे भागातील पुढाऱ्यांनी केली आहे.
मंत्री देसाई यांनी या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, तारळे भागात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर अनेक लोक गब्बर झाले आहेत. त्या सगळय़ांची बोबडी वळली असून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून नेमकी कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागुन राहिले आहे. दरम्यान, पीडित शेतकरी न्याय मिळेपर्यंत लढा लढण्याचा निर्धार केलेला आहे.
रस्त्याबाबतही मांडली कैफियततारळै भागातील रेडेवाडी, केळेवाडी वरची, केळेवाडी खालची येथील ग्रामस्थांनी रस्त्याबाबत आपली कैफियत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडली आहे.