वार्ताहर/आदर्की
फलटण पश्चिम भागातील शरयू कारखान्यातून मळी वाहतुक करणाऱ्या टॅकरचालकाने मद्यधुंद वाहन चालवून फलटण सातारा रस्त्यावर मळी सोडल्याने रस्त्यावर वाहनांची घसरगुंडी झाली. या अपघातात दोन जण जखमी झाले. मात्र तरीही टॅकर चालक सुसाट वाहन चालवित होता. परिसरातील ग्रामस्थांनी वेळीच प्रसंगावधान राखून टॅकरचालकास ताब्यात घेतले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
कापशी ( ता. फलटण ) येथील शरयू साखर कारखान्याचा नुकताच गळीत हंगाम संपला आहे. त्यामुळे कारखाना प्रकीयातील रसायन ( मळी ) विल्हेवाट लावण्यासाठी मल्लीकाअर्जुन ट्रान्सपोर्ट या ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे. सदर रसायन ( मळी ) हे कारखानापासून बाहेर दुरवर ओतले जाते. मात्र हेच रसायन जमिनीतील मुरूम दगड गोटे भूसभूसीत करत असल्याचा शेतकऱ्यांचा कयास आहे. याचाच फायदा घेत हि मळी शेतकऱ्यांच्या शेतात मोफत सोडली जाते. त्यामुळे आदर्की, कापशी, आळजापुर या परिसरात मळी टाकण्यासाठी टॅकर फिरत आहेत.
रविवार दुपारी एका शेतकऱ्याच्या शेतात मळी टाकून टॅकर क्र (MH-12-QG-0329) चालकाने तसाच वॉल चालू ठेवून मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात फलटण सातारा रोडवर टॅकर चालविला. त्यामुळे डांबरावर मळी सांडून रस्ता निसरडा झाला. परिणामी या रोडवरून जाणाऱ्या वाहनांचा अपघात होवून दोन मोटरसायकल स्वार जखमी झाले. त्यामुळे अपघातात वाढ होण्याची भिती व्यक्त होत असल्याने संबधीतावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.