कांदा झाला 80 रुपये किलो, पावट्याने गाठली शंभरी, वांग्याला आलाय भलताच दर, बाजारात खिसा होतोय झटक्यात रिकामा पिशवी काय भरणा, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चांदी
सातारा / प्रतिनिधी
नुकतीच दिवाळी संपली आहे मात्र महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाचे दिवाळे निघत आहेत.सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला अजून ही कोरोनामुळे रोजगार मिळत नाही मात्र बाजारपेठेत भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.कांदा 80 रुपये किलोने झाल्याने आमटीच्या रस्यातून कांदा गायब झाला आहे. वांग्याला भलताच भाव आला आहे तर पावट्याने शंभरी गाठली आहे.व्यापारी व शेतकऱ्यांची चांदी होत असली तरीही सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत.
कोरोनामुळे अगोदरच सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.अनलॉक सुरू झाले असले तरी अनेकांचे गेलेले रोजगार अजून परत मिळाले नाहीत.पोटासाठी मिळेल ते काम करून गुजराण सुरू आहे. नुकताच दिवाळीचा सण झाला. या सणाला एवढा उत्साह दिसत नव्हता.दिवाळी झाल्यानंतर भाज्यांचे दर अजून ही तेजीतच आहेत. मेथीची पेंडी 15 रुपयाला एक, कोथंबीर पेंडी 10 रुपयाला एक मिळत आहे. कांदा 80 रुपये किलोवर झाला आहे.वांगी 80 रुपये किलोवर पोहचली आहेत. पावट्याने तर शंभरी गाठली आहे.बालूऱ्याच्या शेंगा तर मिळेनाशी झाली आहे.दोडका, कारले, ढबू मिरची ही तेजीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा खिसा बाजारात रिकामा होतो पण बाजाराने पिशवी काय भरत नाही अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे.
कुठे गेले आंदोलनकर्ते?
महागाई वाढली की जिल्हाधिकारी कार्यलयाच्या समोर आंदोलन करणाऱ्या संघटना सध्या कुठे दिसत नाहीत.या संघटनांना बिहार निवडणूकित काय झाले याचेच वेध लागले आहेत.इथल्या प्रश्नांवर मात्र या संघटनांची चुप्पी असल्याची चर्चा आहे.