माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्याकडून प्रवेश प्रक्रियेची पाहणी
प्रतिनिधी / सातारा
शाळा महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेदरम्यान हलगर्जीपणाबाबत तक्रारी येत आहेत. या तक्रारीबाबत माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या उच्च माध्यमिक विद्यालयास भेट देवून प्रवेश प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी शाळा व महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी नोटीसमध्ये म्हटले की, अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविताना दिलेल्या सूचनेचे पालन न करण्याचे कारण काय, प्रवेश प्रक्रियेवर कोणतेही सनियंत्रण नाही. प्रवेशासाठी प्राप्त अर्जावरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली नसून ती प्रसिद्ध केली नाही. अशी यादी विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करून न देण्याचे कारण काय, अकरावी प्रवेश प्रक्रियेची समाजमाध्यमांद्वारे व वेबसाइटद्वारे पुरेशी माहिती व प्रसिद्ध न करणे, मदतकक्ष, दिव्यांगाची व्यवस्था का केली गेली नाही.
शुल्क निश्चितीसाठी शिक्षक पालक संघाचे इतिवृत्ताबाबत कार्यवाही न करण्याचा नेमका हेतू काय, याबाबत शाळा, महाविद्यालयांना नोटीसा काढल्या आहेत. या मुद्याचा खुलासा माध्यमिक शिक्षण विभागास पुराव्यासहित सादर करावा. खुलासा वेळेत न आल्यास अथवा असमाधानकारक असल्यास एमईपीएस नियम 1981 नुसार पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे.