नागठाणे / प्रतिनिधी :
तीन बांगलादेशी महिलांची वेश्या व्यवसायातून मुक्तता करणाऱ्या महिला पोलिसाचा नुकताच मुख्यमंत्र्याच्या हस्ते विशेष गोैरव करण्यात आला. शुभांगी गौरव कांबळे असे या महिला पोलिसाचे नाव आहे. त्या माजगाव (ता. सातारा) येथील रहिवासी आहेत.
कांबळे या सध्या मुंबई पोलीस दलातील मुख्य नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे त्या तिथे काम पाहतात. आपली सेवा बजावत असताना नियंत्रण कक्षात एका अनोळखी महिलेचा फोन आला. आपल्याला वेश्या व्यवसायासाठी मुंबई येथे आणल्याची माहिती तिने या वेळी पोलिसांना दिली. या माहितीनुसार कांबळे यांनी अत्यंत मेहनतीने तांत्रिक पद्धतीचा अवलंब करत संबंधित महिलेचे लोकेशन तपासले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या सतत संपर्कात राहून संबंधित महिलेपर्यंत पोचण्यात यश मिळविले.
या महिलेकडून माहिती घेतल्यानंतर आणखी दोन महिलांनाही अशाच पद्धतीने व्यवसायासाठी मुंबईत आणले असल्याचे स्पष्ट झाले. या तिन्ही महिला मूळच्या बांगला देशातील होत्या. त्यांना वेश्या व्यवसायासाठी मुंबईत आणण्यात आले होते. या तिन्ही महिलांची पोलिसांनी सुटका केली. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी पोचविण्यासाठीही पोलिसांनी पुढाकार घेतला.
या प्रशंसनीय कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कांबळे यांचा विशेष गोैरव करण्यात आला. या कार्यक्रमास मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या यशाबद्दल माजगाव येथील ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी कांबळे यांचे अभिनंदन केले.