सातारा / प्रतिनिधी :
पालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासन सदैव तत्पर आहे. मार्च अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिली आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ या कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्याधिकारी यांच्या दालनात मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी युनियनच्यावतीने अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने गेली दोन वर्षे गणवेशाचा प्रश्न प्रलंबीत आहे. सतत मिटींगचे कारण सांगून वेळकाढूपणा पालिका प्रशासन करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याच बरोबर कामगारांनी जिवाची पर्वा न करता कोविड – 19 च्या महामारी निवारण्यासाठी वर्षभर काम केले. त्याकरीता नियमीत वेतनाबरोबर एक हजार रूपये प्रोत्साहान भत्ता द्यावा, असे असताना पालिकेने फक्त एक हजार रूपये भत्ता दिला आहे. उरलेला थकीत प्रोत्साहान भत्ता द्याव अशी जोरदार मागणी करण्यात आली.
यावेळी सातवा वेतन आयोगाचा फरक निवृत्त वेतन धारकांना देण्याचे मान्य करून नियमित कामगारांना मार्च अखेर भत्ता देण्यात येईल तसेच धुलाई भत्ता व शिलाई भत्त्यात प्रचलीत दराने वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याचाही मार्च अखेर मार्ग काढण्याचे मान्य करण्यात आले आहे.
तसेच सेवा जेष्टतेची, वारसा हक्काची व श्रम साफल्य योजनेची आद्यावत यादी प्रसिद्ध करण्यात यावी, या बाबत ही सकारात्मक चर्चा करण्यात आली. वेळप्रसंगी कामगाराला अचानकपणे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आल्यास त्यांच्या औषध उपचारासाठी तातडीची मदत म्हणून कमीत कमी 25हजाराची तर्तूद करण्यात यावी, या वरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. परंतू हे प्रश्न मार्च अखेर न सुटल्यास युनियनला आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागू नये, यासाठी प्रशासनाने योग्य सहकार्य करावे, अशी मागणी केल्यानंतर मुख्याधिकारी बापट यांनी सकारात्मक चर्चा करून मार्च अखेर प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक आश्वासन युनीयनच्या पदाधिकाऱ्यांना दिले.