प्रतिनिधी / वाठार किरोली
राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने प्रेरित होवून धामणेर सारख्या गावाने ग्रामस्वच्छता चळवळ देशाच्या नकाशावर नेण्याचे काम केले असून इतर गावांनी सक्रिय होण्याची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांनी व्यक्त केले. ते अविष्कार फाउंडेशन कोल्हापूरचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू गौरव पुरस्कार धामणेरचे सरपंच शहाजी क्षीरसागर यांना प्रदान करण्यात आला. त्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार, प्रदेश महासचिव शैला कांबरे, उज्वला सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. शहाजी क्षीरसागर म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो आणि हा पुरस्कार माझ्या गावास समर्पित करीत असून यामुळे धामणेरवासीयाना सामाजिकार्यात बळ मिळत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक देसाई, जयवंत पाटील, प्रवीण क्षीरसागर, सुनील क्षीरसागर, शंकर पवार, शशिकांत क्षीरसागर, दिपक देशमुख बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.