महाबळेश्वर / प्रतिनिधी :
महाराष्ट्राच्या राज्यपालांना सुबुद्धी मिळो, महाराष्ट्राच्या प्रगतीत त्यांचाही हातभार लागो यासाठी पवित्र तीर्थस्थळ असलेल्या क्षेत्र महाबळेश्वर मंदिरात शिवसैनिकांच्यावतीने शिवपिंडीला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल बऱ्याच दिवसांपासून संविधानाच्या अधिकाराने बहुमतात आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापित झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भूमिका घेत असून महाराष्ट्राचे राज्यपाल ऐवजी ‘भाज्यपाल’ अशीच भूमिका बजावत आहेत. त्यांना सुबुद्धी मिळो, महाराष्ट्राच्या प्रगतीत त्यांचा ही हातभार लागो यासाठी दुग्धाभिषेक घालण्यात आल्याचे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांनी सांगितले.
यावेळी शहरप्रमुख राजा गुजर, शहर संघटक नाना कदम, उस्मान खारखंडे, अरुण बावळेकर, अशोक ढेबे, बंडू भाऊ लोखंडे, वनिता जाधव, राजश्री भिसे, लक्ष्मी मालुसरे, उज्वला उगले, निलेश धनावडे, पंढरीनाथ लांगी, संरपच सुनिल बिरामणे, उपसंरपच सारिका पुजारी, सदस्य आनिल कात्रट, कल्पना कदम, दिलीप लांगी आदी उपस्थित होते.