लाभार्थ्यांनी कर्ज काढून भरले पैसे; पण मिळाले नाही हक्काचे घर
प्रतिनिधी / सातारा :
लक्ष्मी टेकडीसह शहरातील शनिवार पेठ, केसरकर पेठ, मंगळवार पेठ येथील झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर देण्यासाठी सुमारे आठ वर्षापुर्वी घरकुल योजना आणली गेली. मात्र, या घरकुल योजनेत लाभार्थी यादीत घोळ झाला होता. ती बाब वेगळीच परंतु बांधकाम सुरु आहे. त्याला तब्बल सात वर्ष उलटले तरीही अजून घरकुलाच्या भिंती चढल्या नाहीत. नुसताच स्लॅब टाकण्यात आला असून, त्या इमारतींचा सांगाडा सध्या केवळ पत्या कुठण्याचे केंद्र बनले आहे. लाभार्थी मात्र पैसे भरुन मोकळे झाले आहेत. कधी हक्काचे घर मिळणार याच्या प्रतिक्षेत लाभार्थी आहेत.
सातारा शहरातल्या झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर देण्याकरिता मनोमिलनाच्या काळात युआयडीएसएसएमटी योजनेतंर्गत घरकुल योजना आणली होती. या योजनेतून मंगळवार पेठेतील पत्रेवाला चाळीच्या नजिकच घरकुल योजनेतून इमारत बांधण्यात आली. शनिवार पेठेत राजलक्ष्मी टॉकीजच्या पाठीमागे टुमदार इमारत बांधली गेली. सदर बाजार येथे भीमाबाई आंबेडकर येथेही इमारत बांधली तसेच लक्ष्मी टेकडीवर दोन ठिकाणी घरकुल होते. त्यातील एका ठिकाणचे अर्धे काम पूर्ण तर एका ठिकाणी नुसताच स्लॅब पडला आहे. यातील तीन इमारती सध्या केवळ सांगाडे उभे असून भिंती कधी वर चढणार आणि त्याला दारे कधी लागणार, संडासाचे काम कधी होणार हे सगळे प्रश्न न सुटणारे असे आहेत.
लाभार्थी मात्र पैसे भरुन मोकळे झालेले आहेत. त्यामुळे हक्काचे घर मिळणार कधी याकडे लाभार्थ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. हे बांधकाम करण्यासाठी झोपडपट्टी पाण्याच्या टाकीखाली बसवण्यात आली होती. त्याच झोपडपट्टीचे खांबही आता सडू लागले आहेत. तरीही अजून घरकुल मिळत नाहीत.
योजनेला झालेली वर्ष-7 वर्ष
एकूण घरे-524
अद्याप अपूर्ण घरे-353
लोकसंख्या-4500