नोकरी गेल्याने आर्थिक संकटाचे सावट, घर खर्चाचा वाढलाय बोजा : तरूणांना भविष्याची चिंता
सातारा / गौरी आवळे
देशात लॉकडाऊनमुळे समस्यांनी डोकेवर काढले आहे. अनेकांच्या नोकऱया गेल्याने आर्थिक संकटाचे सावट त्यांच्या भोवती फिरू लागले आहे. यामुळे मानसिक ताण-तणाव वाढत चालला आहे. सरकारी क्षेत्रापेक्षा खाजगी क्षेत्राची अवस्था बिकट बनली आहे. अनेक तरूण बेरोजगार झाले आहेत. तर बेरोजगार तरूणांना काम मिळेल का ? अशी चिंता लागून राहिली आहे.
कोरोना बाधितांचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, सरकारी-खाजगी कार्यालये बंद झाली. सर्व उद्योग धंदे बंद झाले. पगार वेळेवर मिळत नव्हते आणि पगारात कपात सुरू झाली. यामुळे खर्च जास्त आणि पगार कमी मिळाल्याने प्रत्येक व्यक्ती आर्थिक संकटात सापडला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे गरजा वाढल्या आहेत. तुटपुंज्या पगारात या गरजा भागवायच्या कशा असा प्रश्न सर्वापुढे उभा आहे.
लॉकडाऊनने मानसिक आरोग्यावर मोठया प्रमाणात परिणाम केला आहे. 65 टक्के लोकांना मध्यम ते तीव्र स्वरूपाचा तणाव आहे. लोकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे हे संकट अजून किंती दिवस राहील. दीर्घकाळ चाललेल्या या लॉकडाऊनमुळे काम आणि आयुष्य यात संतुलन साधण्यातही अडचण झाली आहे.
तणावग्रस्तांमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण अधिक (39टक्के) आहे. तर नोकरदार (35टक्के) आहेत. लॉकडाऊनमध्ये जशी वाढ होत गेली तसं विद्यार्थ्यांना भावनिकदृष्टय़ा जास्त त्रास झाला. राग, चिंता आणि चिडचिड यामध्ये वाढ झाली. लॉकडाऊनमध्ये भावनिक होण्याचं प्रमाण 22 टक्क्यांनी वाढलं. तर झोप 11 टक्क्यांनी कमी झाली. अनेकांनी या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मित्र आणि कुटुंबाशी फोनवर बोलणे, बातम्या वाचणं कमी करणे असे विविध मार्ग अवलंबले असल्याचे मानसोपचारतज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
व्यक्त व्हायला शिका…
माणूस हा समाज प्रिय असल्यामुळे या समाजापासून विभक्त झाला. त्यामुळे वयानुसार त्या व्यक्तीच्या मनावर परिणाम झाला. यामुळे उदासिनता, व्यसने जवळची वाटायला लागतात. या काळात स्वता:चे छंद जोपासता आले असते. काही जणांनी स्वता: पुस्तके वाचून काढली. असे अनेक उपक्रम या लॉकडाऊनमध्ये करता आले असते. तणावमुक्तीसाठी व्यक्त व्हायला शिकले पाहिजे. यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत. यामध्ये परिवर्तन ट्रस्ट आहे. मनोबल हेल्पलाईन सुरू आहे. त्यांच्यावर फोन करून व्यक्त झाले तर व्यक्ती मनमोकळेपणाने जगू शकतो.-किशोर काळोखे, प्रकल्प प्रमुख परिवर्तन व्यसन मुक्ती संस्था.