प्रतिनिधी/वाई
वहागाव (ता वाई) येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लावल्या प्रकरणी विंडवर्ल्ड इंडिया पवनचक्की कंपनीला वाई येथील न्यायालयाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.
वहागाव येथील वनविभागच्या राखीव क्षेत्रात दि. २ मार्च२०१९ रोजी वणवा लागला होता. स्थानिक तपासात हा वणवा विंडवर्ल्ड इंडिया (इनरकॉन) कंपनीचे विद्युत वाहिनीतील शॉर्टसर्किट झाल्याने लागल्याचे सिध्द झाले. विंडवर्ल्ड इंडिया कंपनीमार्फत योग्य त्या उपाययोजना न राबविल्यामुळे अकरा हेक्टर वनक्षेत्र जळीत झाल्याचे सिध्द झाले. यामुळे कंपनीवर वनविभागामार्फत भारतीय वनअधिनियमाचे उल्लंघन झाल्याने वनगुन्हा नोंद करण्यात आला. त्याचा तपास पूर्ण करुन दि. ८ ऑक्टोबर २०२० रोजी वाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.
याप्रकरणी न्यायालयाने कंपनीस पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. कंपनीमार्फत असिस्टंट इंजिनियर यांनी दंडाची रक्कम भरली. ही कारवाई उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहायक वनसंरक्षक व्ही. बी. भडाळे, वाईचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे घाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भुईंज एस. आर. मोरे, वनरक्षक एल. एस. देशमुख, श्रीमती आर. एस. शेख, एस. बी. आडे यांनी पार पाडली.
वणवा लावल्यामुळे जंगलाची निसर्ग संपदेची हानी होवून पर्यावरणाचे नुकसान होते. त्यामुळे वणवा लावणे अपराध असून तो सिध्द झाल्यास पाच वर्षे कैद किंवा पाच हजार रुपये दंड होवू शकतो. त्यामुळे राखीव वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे, वणवा लावणे, शिकार करणे यांसारखे वनगुन्हे करुन नयेत, असे आवाहन वन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.