निर्बंध पाळून उत्सव साजरा करण्यास परवानगी
वाई : येथील कृष्णामाईच्या उत्सवास भीमकुंड आळीतील उत्सवाने आजपासून सुरवात झाली. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासानाने शहरात जमा बंदी आदेश कलम लागू करून उत्सवातील पालखी, छबिना, हळदी-कुंकु, महाप्रासद, भजन, कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे या वर्षीचा उत्सव अंत्यत साधेपणाने साजरा होणार आहे.
शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावर यशपूर्तीसाठी सुरु झालेला, ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा उत्सव लोकवर्गणीतून साजरा केला जातो. कृष्णातीरावरील सात घाटावर एका पाठोपाठ एक याप्रमाणे सव्वा महिना हा उत्सव सुरु असतो. प्रत्येक घाटावर चार ते पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षींचा उत्सव शुक्रवार (दि१२) श्री.कृष्णाबाई संस्थान घाट भीमकुंड आळीच्या उत्सवाने होत आहे.
कोरोनाचा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव रद्द केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी कायदा व सुवव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात कृष्णाबाईच्या उत्सव काळात १२ फेब्रुवारी ते २६ मार्च २१ अखेर जमाबंदी कलम लागू केले असून काही निर्बंध घातले आहेत. यावेळी उत्सवात पालखी व छबिना काढणेस, देवीची ओटी भरणेस व दर्शन घेण्यास, महाप्रसाद तसेच या कालावधीत भजन, किर्तन या सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. देवीची प्रतिष्ठापना करून देवीचे नित्याचे धार्मिक विधी फक्त संबंधित पुजारी व ठराविक दहा व्यक्तींचे उपस्थितीत पार पाडणेची आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासाने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन करून या वर्षींचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी भीमकुंड आळीतील उत्सवानंतर मधली आळी (मंगळवार १६ फेब्रुवारी ), धर्मपुरी (सोमवार २२ फेब्रुवारी), गणपती आळी (रविवार २८ फेब्रुवारी), ब्राम्हणशाही (शुक्रवार ५ मार्च), रामडोहआळी ( सोमवार १५ मार्च) व गंगापुरी ( शुक्रवार १९ मार्च) असे एका पाठोपाठ एक उत्सव होणार आहेत. यावर्षी प्रत्येक आळीचा उत्सव नदीच्या काठावरील घाटावर खुल्या जागेत न होता मंगल कार्यालयात होणार आहेत.