प्रतिनिधी / सातारा :
वाई बाजार समितीत मागील काही दिवसांपूर्वी हदळीचे लिलाव पार पडले होते. त्यात हळदीला 29 हजार रुपयांपर्यंत दर दिला गेला होता. सध्या व्यापाऱ्यांकडे हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने लिलाव बंद करण्यात आले. लिलावाची प्रक्रिया बंद असल्याने आज शेतकऱ्यांनी वाई बाजार समितीवर मोर्चा काढला. सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांनी या शेतकऱ्यांना लवकरच लिलाव घेवू, असे आश्वासन दिले. अन् शेतकऱ्यांचे आंदोलन तुर्तास स्थगित झाले.
वाईच्या बाजार समितीमध्ये हळदीला 29 हजार रुपये भाव निघाला. यामुळे बाजार समितीच्या आवारात सर्व व्यापाऱ्यांच्या आडत दुकानांवर आठ ते दहा हजार पोत्यांची आवक झाली आहे. मात्र, मागील एक महिन्यापासून लिलाव बंद आहेत. आज आठवडी बाजार सोमवारमुळे लिलाव होतील, या अपेक्षेने मोठया संख्येने शेतकरी बाजार समितीत जमा झाले होते. बराच वेळ थांबल्यानंतरही लिलाव निघत नाहीत, असे दिसून आल्यावर व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बाजार समितीचे कर्मचारी व सदस्य व सभापती उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांच्याकडे दहा हजारांच्या पुढे बोली काढावी, तसेच लवकरात लवकर हळदीचे पैसे मिळावे, अशी मागणी केली. यावेळी सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेवून ताबडतोब लिलाव घेवू असे आश्वासन दिले.