विशाल कदम/ सातारा
सातारा विकास आघाडीची सातारा पालिकेत सत्ता आहे. सत्तेमध्ये भाजपाच्या नगरसेवकांना गेल्या दोन वर्षांपासून वाटा दिला गेला आहे. पदाधिकाऱयांच्या निवडीमध्ये सातारा विकास आघाडीच्या काही नगरसेवकांना संधी दिली गेली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यातच गतनिवडणूकीत काहीजणांचा पराभव झाल्याने ते ही नाराज आहेत. तर काहींना चांगले पद दिले गेले नसल्याने अशी अनेक नाराज मंडळींची जंत्री आहेत. त्यातच भर आता भाजपाच्या काही नगरसेवकांची पडली आहे. त्यामुळे सत्ताधारी साविआमध्येच येवू घातलेल्या पालिकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने रणकंदन सुरु झाले आहे. त्यामुळे राजे तुम्हीच नगरसेवकांची शाळा घ्या, असा सुर सातारकरांमधून उमटत आहे.
सातारा विकास आघाडीमध्ये अनेकदा एकीचा अभाव असल्याचे साडे चार वर्षात सातारकरांनी अनुभवले. सुरुवातीच्या काळखंडात उपाध्यक्ष म्हणून सुहास राजेशिर्के यांना संधी दिली होती. त्यानंतर त्यांना पाणी पुरवठा सभापतीपदाची संधी दिली गेली होती. तसेच आरोग्य सभापती म्हणून वसंत लेवे यांनाही संधी दिली गेली होती. बांधकाम सभापती व उपाध्यक्ष म्हणून किशोर शिंदे यांना संधी दिली गेली होती. तर स्वीकृत म्हणून सलग पाच वेळा ऍड.दत्ता बनकर यांना संधी दिली गेली आहे. तसेच पाणी पुरवठा म्हणून श्रीकांत आंबेकर यांनाही संधी दिली गेली होती. मात्र, काही महिन्यापूर्वी पदाधिकारी निवडी पार पडल्या. तसेच ज्यांना संधी दिली नाही तेही नाराज आहेत आणि ज्यांना संधी दिली तेही नाराज आहेत. याचा प्रत्यय दस्तुरखुद्द उदयनराजेंना वारंवार आला आहे. अगदी लोकसभेच्या निवडणूकीच्या वेळी वॉर्डात प्रचारामध्ये काही नगरसेवक हे गायब होते. तर काही कोपरा सभेला असूनही कोपऱयातच बसून सारे काही गप्प पाहत होते. सध्या सातारा पालिकेत जे पदाधिकारी आहेत त्यामध्येही अध्यक्ष माधवी कदम यांच्या विरोधात काहीजण कंडया पिकवतात तर काहीजण उपाध्यक्ष मनोज शेंडे यांच्या विरोधात कंडय़ा पिकवतात. तर काहीजण नाराजी थेट व्यक्त करतात. त्यामध्ये माजी उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी कामे होत नसल्याची खंत व्यक्त केली. तर भाजपाच्या नगरसेविका सिद्धी पवार यांच्याकडून ठेकेदार आणि मुख्याधिकाऱयांना फोनवरुन शिवीगाळ दमदाटीचे प्रकार, पुन्हा राजीनाम्याचा पवित्रा हे प्रकार गाजत आहेत. त्यामुळे सातारा विकास आघाडीमध्ये नेमक्या काडया कोण टाकतय आणि कोण बघतय तमाशा, कोण करतय ड्रामा असाच प्रकार सुरु असून आघाडीचे नेते खासदार उदयनराजेंनीच आता सातारा विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांची शाळा घेवून चांगला एकीचा धडा देणे गरजेचे आहे, अशीच अपेक्षा सातारकरांकडून व्यक्त होवू लागली आहे. दरम्यान, आगामी पालिकेच्या निवडणूका डोळयासमोर ठेवून सातारा विकास आघाडीमधील नगरसेवकांमध्येच रणकंदन सुरु असल्याचे सातारकरांना चांगलेच ज्ञात आहे.