प्रतिनिधी / सातारा
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफाँर्म यूटय़ूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून वीज बिल माफ होणार असल्याची अफवा या व्हिडिओच्या माध्यमातून पसरवली जात आहे. मात्र अशी कोणतीही योजना जाहीर केली नसल्याचे सातार्यातील महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
लॉकडाऊनमध्ये मीटर चेक न करता वीज ग्राहकांना वीज बिले पाठवण्यात आली आहेत. सर्वत्र आर्थिक संकट निर्माण झाल्याने ही वाढीव बिले भरण्यास विरोध होत आहे. बिलाचा भरणा न केल्यास विद्यृत पुरवठा खंडीत केला जाईल, या भीतीने काही ग्राहकांनी ही बिले भरली आहे. तर काही ग्राहक गेल्या चार-पाच महिन्यापासून वीज बिल माफीच्या प्रतिक्षेत आहेत. याच पार्श्वभुमीवर सोशल मीडियावर येत्या 1 सप्टेंबरपासून वीज बिले माफ होणार असल्याचा व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे.
आता सरकार वीज बिल माफी योजना 2020 आणत आहे अशी माहिती या व्हिडिओतून समोर येत आहे. यामुळे सातारासह संपूर्ण जिह्यात वीज बिल माफीची चर्चा सुरू आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता हा व्हिडिओ खोटा असल्याचे महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर विचार सुरू आहे. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही असे कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे अफवांना बळी पडु नये असे आवाहन वीज ग्राहकांना करण्यात येत आहे.