गायरानातील वहिवाटीवरून ग्रामस्थ-वाहिवाटदार वाद
बोरगाव पोलिसांत दोन गुन्हे दाखल
प्रतिनिधी / नागठाणे
वेणेगाव (ता.सातारा) येथील गायरान जमिनीतील वहिवाटीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ग्रामस्थ विरुद्ध वहिवटदार यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. शुक्रवारी दिवसभरात या वादाच्या कारणावरून बोरगाव पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. बोरगाव पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २४ जणांविरुद्ध तर गायरानात वहिवटत असलेल्या जमिनीतील ऊस पेटवून दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात निवृत्ती बाजीराव काटे, मोहन मारुती घोरपडे, रामचंद्र केरू सावंत, विजयसिंह माधवराव घोरपडे, मानसिंग निवृत्ती काटे, नितीन आनंदा सावंत, सुरेखा आनंदा सावंत, मधुकर विष्णू सावंत, विठ्ठल मारुती सावंत, वैभव पुरुषोत्तम चव्हाण, गणेश संपत चव्हाण, चंद्रकांत लक्ष्मण जाधव, प्रमोद तानाजी सावंत, माणिक जयसिंग सावंत, सचिन अरविंद घोरपडे, संजय जयसिंग सावंत,विशाल आप्पासो सावंत, संजय पंढरीनाथ पवार, अमोल उमेश काटे, रुपेश उर्फ संतोष दिनकर चव्हाण, ज्ञानेश्वर विलास शेळके, बजरंग अनिल काकडे, शिवाजी प्रल्हाद यादव, किशोर जयसिंग चव्हाण (सर्व रा.वेणेगाव, ता.सातारा) यांच्यासह अज्ञात सुमारे ६० ते ७० जणांविरुद्ध भा.दं. वि.स कलम १८८,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र कोव्हिडं विनियमन कलम ११ व साथरोग प्रतिबंधक अधिनियम १९८७ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या सर्वांनी शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागु असतानाही गावातील गायरान जमिनीत स्वतःच्या गाई-म्हशी चरण्यास सोडण्यासाठी गावातील एसटी स्टॅन्ड परिसरात मोठ्या जमावासह गोळा झाले होते. त्यांना पोलिसांनी ध्वनिक्षेपकाहून जमाव न करण्याच्या सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करून गर्दी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सपोनि डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय वर्षा डाळींबकर, साहाय्यक फौजदार बाजीराव पायमल, राजू शिंदे व विशाल जाधव यांनी ही कारवाई केली. याची फिर्याद हवालदार सुनील जाधव यांनी दाखल केली आहे.
तर मोहित मानसिंग काटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चंद्रकांत लक्ष्मण जाधव यांच्याविरुद्घ शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित काटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची वेणेगावात माळ नावाच्या शिवरात गट नं.२७०/१ मध्ये ८० गुंठे जमीन असून ती त्यांचे आजोबा निवृत्ती बाजीराव काटे यांच्या नावावर आहे. या जमिनीच्या सातबाऱ्यावर गावातील ग्रामस्थ गावची सर्व गुरे चारून वर्गणीने आकार भरतात अशी नोंद असून या नोंदीवरून त्यांचा व वेणेगाव ग्रामस्थांचा वाद सुरू आहे.
या वादाच्या निमित्ताने शुक्रवारी सकाळी सातारा तहसीलदार व बोरगावचे सपोनि डॉ. सागर वाघ यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली होती. यावेळी दोन्ही बाजूने योग्य ते पुरावे सादर करावेत, तहसीलदार अधिकारात जो निर्णय असेल तो दिला जाईल, तहसीलदारांच्या अधिकार क्षेत्राबाहेर असलेला वाद दोन्ही गटाने दिवाणी न्यायालयात सोडवावा असे तहसीलदारांनी सांगितले होते. तर सपोनि डॉ. सागर वाघ यांनी तहसिलदारांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. गावात कायदा व सुव्यवस्था राखा अन्यथा गुन्हे दाखल करावे लागतील असे सांगितले होते.
बैठक संपल्यानंतर दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास सालगडी अजित बापू मोरे याने फोन करून सांगितले की चंद्रकांत लक्ष्मण जाधव याने रानातील उसाचे पीक पेटवून दिले असून ऊस पेटवताना त्याने व लक्ष्मण शिवशंकर पवार यांनी पाहिला आहे. या आगीत सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.