गर्दी अन वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
प्रतिनिधी/ सातारा
दीपावलीचा सोमवारी पहिला दिवस होता. गत दोन तीन दिवसांपासून सातारा शहरातील मुख्य मार्केट परिसरात प्रचंड गर्दी होतीच. मात्र, दीपावलीच्या पहिल्या दिवशी शहरातील राजवाडा, पोवईनाका, मोती चौक, सदाशिव पेठ, खणआळी, शनिवार चौक परिसरात तुडूंब गर्दी झालेली होती. यामध्ये मोठया वाहनांना बंदी असतानाही ही वाहने गर्दीत येत असल्याने रात्रीपर्यंत वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले होते.
दिवाळीच्या काही आठवडय़ा अगोदरपासूनच साताऱयातील बाजारपेठा प्रचंड मोठय़ा प्रमाणात गजबजू लागलेल्या दिसल्या. शहरातील राजवाडा, मोती चौक, पोवईनाका, बसस्थानक परिसर, खणआळी, सदाशिव पेठ परिसरातील मार्केटमध्ये खरेदीसाठी अक्षरश झुंबड उडाली होती. यामध्ये पोलीस दलाकडून गर्दी व वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राजपथावर कमानी हौद ते राजवाडा तसेच शनिवार चौक ते सदाशिव पेठेत मोठया व अवजड वाहनांना बंदी घातलेली आहे.
मात्र अनेक मोठी वाहने बंदी आदेश डावलून गर्दीत घुसत होती. दोन्ही बाजुला पार्किंगमध्ये दुचाकी, मोठी वाहने याने सातत्याने वाहतूक कोंडी तोंड द्यावे लागत होते. मात्र, हे सर्व घडत असताना वाहतूक शाखेचे कर्मचारी कोणत्याही प्रकारचे वाहतूक नियंत्रण व नियोजन करताना दिसून येत नव्हते. दीपावलीच्या गडबडीत नागरिक मात्र जसे होईल तशी खरेदी करुन गर्दी व वाहतूक कोंडीतून वाट काढताना दिसून येत होते.
दिवाळी निमित्तानं बाजारपेठा गजबजू लागल्याचा आनंद निश्चितच दुकानदारांच्या आणि ग्राहकांच्या चेहऱयांवर दिसून येत होता. मात्र, हा सण आरोग्यदायी पद्धतीनं साजरा करण्यासाठी स्वस्थ राहणंही तितकंच गरजेचं आहे. खरेदीसाठी बाजारात पोहचलेले अनेक ग्राहक मास्क वापरण्याचीही तसदी घेताना दिसत नाहीत. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर अशा अनेक कोरोना नियमांना पायदळी तुडवत होते. तर अनेक ठिकाणी गर्दीवर कुणाचही नियंत्रण नाही. बाजारात ग्राहकांनी प्रचंड गर्दी केल्यानं सोशल डिस्टन्सिंगला वावही उरत नसल्याचे दिसून आले.
गेल्या काही महिन्यांत कोरोनाचे आकडे खाली घसरलेले दिसून आलेत. त्यामुळे नागरिकांच्या मनातील करोनाची भीतीही नाहिशी झालीय. मात्र, कोरोना संक्रमण अद्याप मुळातून नष्ट झालेलं नाही. त्यामुळे काळजी घेणेही आवश्यक असले तरी साताऱयातील गर्दीत या सर्व नियमांना तशी तिलांजली मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेकांचे मास्क नाकावरुन तोंडावर आले होते तर दुकानांमध्ये एकाच वेळी असंख्य ग्राहक असल्याने सामाजिक अंतराचा बोजवारा उडून गेल्याचेही चित्र सातारकरांनी अनुभवले.
वाहतूक कोंडीत वाहतूक कर्मचारी गायब
सध्या बाजारपेठेत गर्दी होणार ही दरवर्षी प्रमाणे सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र, या गर्दीचे वाहनांचे नियोजन करुन शहरात कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही तसेच कोरोनाचे नियम पाळले जावेत याबाबत जिल्हाधिकाऱयांच्या स्पष्ट सुचना असताना देखील शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी भर गर्दीत वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी परिसरातून गायब असल्याची तक्रार नागरिकांकडून होत होती.