गौरी आवळे / सातारा :
मासिक पाळीच्या दरम्यान सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे म्हणजे कुचंबणा असल्याने महिलांच्या स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळीच्या खोलीची संकल्पना ठाण्यात उदयास आली आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत. मग सातारा नगर पालिकेत आता महिला राज असून ही संकल्पना साताऱ्यात का? उदयास येऊ शकत नाही, अशी चर्चा महिलांमध्ये होत आहे.
मासिक पाळीविषयीच्या सामाजिक गैरसमजांमधून अनेक वाईट रूढी, परंपरा वाढीस लागल्या आहेत. त्याचा त्रास महिलांना होत असून लज्जेमुळे याविषयी कोणीही स्पष्टपणे बोलत नाही. सर्वसामान्य महिला, झोपडपट्टीत राहणाऱ्या महिला या दिवसामध्ये सार्वजानिक शौचालयांवर अवलंबून असतात. त्यात पाणीकपात, अस्वच्छ खोल्या, आणि सॅनिटरी पॅडच्या कचरा व्यवस्थापनाचा अभाव अशा समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. यांची दखल घेत ठाण्यात भारतातील पहिला मासिक पाळीच्या खोलीचे अनावरण करण्यात आले.
या खोलीमध्ये नळ, जेट स्प्रे, आरसा, सॅनिटरी पॅड टाकण्यासाठी कचरापेटी आहे. कचरा पेटीतील कचरा हाताचा वापर न करता काढण्यासाठी पेटीच्या खालच्या बाजूने झाकण आहे. तसेच साबणाची बाटली, कपडे अडकवण्याकरिता खिळे आणि बाथरूमची सोय सुद्धा आहे. अशी खोली सातारा शहरात होणे गरजेचे आहे. शहरात दररोज ग्रामीण भागातून महिला कामानिमित्त येत असतात. यांना नैसर्गिक क्रिया करण्यासाठी राजवाडा आणि एसटी स्टॅड येथे सार्वजनिक शौचालय आहे. इतर कोणत्याही ठिकाणी स्वच्छता गृह नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. यांची दखल सातारा नगरपालिका कधीही घेत नाही.
दरवर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणात महिलांसाठी स्वच्छता गृह उभारण्याचे धोरण आखले जाते. मात्र हे धोरण कागदावर राहते. यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. महिलांच्या प्रश्नावर सातारा नगरपालिका कधीही गांर्भीयाने विचार करत नाही. यामुळे महिलांना सोयी-सुविधा मिळत नसल्याने त्यांच्या समस्या चव्हाटय़ावर येवून पडल्या आहेत.
सातारा पालिकेत ‘महिलाराज’
सातारा नगरपालिकेत यंदा महिलांना संधी देण्यात आली आहे. सर्वच महिला सभापती असल्याने महिलांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे काम या करतील, याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. शहरात महिला स्वच्छता गृहाचा प्रश्न बिकट बनला असताना नुसती आश्वासने नको तर यांची अंमलबजावणी ही झाली पाहिजे. तसेच ठाणे शहराप्रमाणे साताऱ्यातही मासिक पाळी खोलीची संकल्पना उदयास आली पाहिजे, अशी मागणी महिलांच्या वतीने होत आहे.
सभेत ठराव मंजूर करणार…
महिला स्वच्छता गृह नसल्याने महिलांना होणार त्रास कमी करण्यासाठी यंदा सर्वसाधारण सभेत हा विषय मंजूर करणार आहे. आणि जी ठिकाणे आम्ही निश्चित केली आहेत. त्या ठिकाणावर लवकरच स्वच्छता गृहाची उभारणी करण्यात येणार आहे.
माधवी कदम, नगराध्यक्षा सातारा नगरपरिषद