प्रतिनिधी/ सातारा
हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्यानुसार सातारा शहरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वीजांच्या लखलखाटासह ढगांच्या गडगडाटाने परतीच्या पावसाने चांगलेच झोपडून काढले. तब्बल तासभर झालेल्या या पावसाने सातारकरांची चांगलीच दाणादाण उडवून दिली. अचानकपणे सुरु केलेल्या या पावसामध्ये अनेकजण रस्त्यातच चिंब भिजून गेले तर मुख्य बाजारपेठेतल्या व्यावासयिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सखल भागातील रस्त्यावरुन चांगलेच पाणी वाहिले. सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सातारा पालिकेतून सांगण्यात आले.
हवामान खात्याकडून गेल्या दोन दिवसांमध्ये पाऊसाचा अंदाज वर्तवला गेला होता. त्यानुसार सातारा शहरासह जिह्यात वातावरण गर्मीचे आणि उकाडय़ाचे रात्री व दिवसभर सुरु असून दिवसाही फॅन, एसी कुलरची हवा घेतली जात आहे. सकाळपासून चांगले खडखडीत उन्ह होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक ढग जमू लागले. अडीच पावणे तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या पावसाने मंगळवार पेठ, माची पेठ, समर्थ मंदिर, केसरकर पेठ, बुधवार पेठ, पोवई नाका, शनिवार पेठ, बुधवार पेठ आदी भागामध्ये चांगलेच झोपडून काढले. तब्बल एक तासाच्या पावसाने अनेकजणांची ताराबंळ उडाली होती. शहरात मुख्य बाजारपेठेत पदपथ विक्रेते व भाजी विक्रेत्यांची दुकानांची आवराआवरही करताना चांगलीच त्रेधा उडाली. झाकापाक करताना चांगलेचीच पळापळ झाली होती. शहरात कुठेही नुकसान झाले नसल्याची माहिती सातारा नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातून देण्यात आली.
शहरालगतच्या गावांमध्ये शेतीचे झाले नुकसान
शेतीच्या काढणीचे कामे वेगाने सुरु आहेत. भूईमूग व इतर पिकांची काढणी सुरु आहे. काही ठिकाणी मळणी करण्यासाठी सोयाबीन रचून ठेवण्यात आला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱयांचे नुकसान झाल्याचेही सांगण्यात आले.