पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनाच मुदतवाढ देण्याची होतेय मागणी
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर पोलिस ठाण्याचा कारभार तात्कालिन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे हे सर्व कर्मचाऱयांना सोबत घेवून करत होते. एकेकाळी या पोलीस ठाण्यात सुमारे अडीचशे कर्मचारी होते आता तोच आकडा दिडशेवर आहे. याच संख्याबळावर मांजरे साहेब गाडा चालवत होते. आता त्यांच्या बदलीनंतर भगवान निंबाळकर व सहाय्यक म्हणून वंदना सुंदर असे दोन अधिकारी आलेले आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या डीटेक्शन ब्रँचमध्ये नव्या दमाची फौज घेतली आहे. परंतु त्यांचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांची बदली शाहुपूरीला झाली आहे. त्यांनाच मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी होवू लागली आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्यामध्ये पुर्वीच्या तुलनेत सध्या कर्मचाऱयांची संख्या कमी आहे. नवीन पोलीस भरती न झाल्याने ही संख्या गेल्या चार वर्षात घटलेली आहे. पोलिस ठाण्याचा आवाका मोठा आहे. अगदी संगममाहुली, खेडपासून कोडोली काळोशी, खिंडवाडीपर्यंतचा भाग शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. औद्योगिक वसाहतीत होणाऱया चोऱयांवर आळा घालणे, संवेदनशील असलेल्या प्रतापसिंहनगरामध्ये लक्ष ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आदी बाबी तसेच मंत्री, आमदार यांचे दौरे, जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलने याचबरोबर शहरात घडणाऱया गुन्हेगारीवर नजर ठेवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर पोलीस सतत अलर्ट असते. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे असताना हे काम अगदी अनुभवी असलेल्या कर्मचाऱयांबरोबर नव्या दमाच्या कर्मचाऱयांना समजून घेवून पोलीस ठाण्याचा गाडा चालवत होते. आता शहर पोलिस ठाण्याला दोन कारभारी आहेत एक भगवान निंबाळकर आणि वंदना सुंदर. परंतु पोलीस ठाण्याची डिटेक्शन ब्रँच महत्वाची असते. त्या ब्रँचचे प्रमुख नानासाहेब कदम यांचीही शाहुपूरी पोलीस ठाण्याला बदली झाली आहे. परंतु पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी शहर पोलीस ठाण्याच्या अखत्यारित अनेक गुन्हे उघडकीस आणले. लक्ष्मी टेकडीवरील गुन्हेगारांकडून गुह्यांची उकल केली. आता डीबीमध्ये आणखी नव्या दमाचे कर्मचारी घेतले गेले आहेत. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम हेच सातारा शहर डिबीला हवे आहेत, अशी मागणी होवू लागली आहे.