वाई / प्रतिनिधी :
ओझर्डे ता. वाई येथील हुतात्मा जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय ३८) यांच्यावर रात्री 11.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तांगडे हे सिक्कीम येथील कॉलिंगपाँण येथे बर्फाच्छादित प्रदेशातील उंच टेकडीवर सिग्नल विभागात कार्यरत होते. तिथे कर्त्यव्य बजावत असताना दिनांक ८ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजणेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टी व वादळी वाऱ्यांच्या थैमानाने ड्युटीवर असलेले तंबू उध्वस्त झाले. ते ५ सहकाऱ्यांसह उघड्यावर राहिले. त्यातच हिमकणांच्या माऱ्याने बेजार झालेले तांगडे कडक बर्फावर आदळल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना दुसऱ्या दिवशी कॉलिंगपाँण येथील बराकपूरला असलेल्या मिल्ट्रीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर ते कोमात गेले व त्यातून ते बाहेरच न आल्याने दिनांक १६ रोजी सकाळी ७ वाजता काळाने त्यांच्यावर झडप घातली.
तांगडे शहीद झाल्याची बातमी ओझर्डेसह वाई तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. १७ रोजी सायंकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी शहीद सोमनाथचे पार्थिव ओझर्डे गावात दाखल झाले. त्यांच्या पार्थिवास १७ ड्यू सिग्नल रेजिमेंटच्या जवानांनी व सातारा, कोल्हापूर व गोवा येथील जवानांनी तांगडे यांच्या घरासमोर त्यांना अखेरची मानवंदना दिली. त्यांच्या अंत्ययात्रेच्या दरम्यान प्रत्येक घराघरातून महिलांसह आबालवृद्धांनी हजारोंच्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा पार्थिवावर पुष्पवृष्टी करून तांगडे यांना श्रद्धांजली वाहिली. रात्री ९ वाजणेच्या सुमारास सोमनाथ यांची अंत्ययात्रा सोनेश्वर स्मशानभूमीकडे रवाना झाली. हि अंत्ययात्रा ११ वाजून ३० मिनिटांनी ओझर्डे येथील स्मशानभूमीत पोहोचली. त्यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, मिल्ट्रीच्या विविध अधिकाऱ्यांनी व सातारा पोलीस दल यांच्यासह वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले- राजापूरकर , तहसीलदार रणजीत भोसले, जिल्हा पोलीस प्रमुख दल यांच्या प्रतिनिधीमार्फत पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. स्मशानभूमीत मिल्ट्री तसेच सातारा पोलीस दलामार्फत पुन्हा एकदा बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात त्यांचे थोरले बंधू जीवन यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी सर्व उपस्थितांना शोक अनावर झाला.