लाखो रुपयांची हानी, आगीचे कारण अस्पष्ट
प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यातील शाहूपुरी येथील मिरचीच्या गोदामाला आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने आणि खाजगी टँकरने ही आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
साताऱ्यातल्या शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या बाजूलाच कच्छी यांचे मिरचीचे गोदाम आहे. या गोदामाला सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. काहींनी सातारा पालिकेच्या अग्निशमन दलास फोन केला. अग्निशमन दलास माहिती मिळताच पथकाचे अधिकारी सौरभ साळुंखे हे पथकास घटनास्थळी पोहचले. लक्ष्मी परळकर यांचे दोन खाजगी पाण्याचे टँकर मागवून लगेच पाणी मारण्याचे काम सुरु झाले. आगीत गोदामातील मिरच्या जळाल्याने सगळीकडे मिरच्यांचा धुर झाला होता. ठसकेही लागत होते. दरम्यान, अग्निशमनला काही वेळातच आग अटोक्यात आणण्यात यश आले. परंतु, तोपर्यंत मिरच्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.