व्यापारी झाले आक्रमक, पालिकेकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याचा आरोप
आरोग्य विभाग करतो काय असा प्रकाश गवळी यांचा सवाल
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरात शाहू क्रीडा संकुलाच्या व्यापारी गाळ्याच्या बाहेर कोपऱ्यात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पालिकेकडून कचरा उचलला जात नाही, असा आरोप वाहतूक संघटनेचे नेते प्रकाश गवळी यांनी केला आहे.
क्रीडा संकुलात दीडशे व्यापारी गाळे आहेत. या गाळ्याच्या कोपऱ्यात कचरा साठला जातो. हा कचरा पालिकेकडून नियमित उचलला जात नाही. विशेष म्हणजे मोकळ्या जागेत कचऱ्याचे आगार बनले आहे. याबाबत प्रकाश गवळी म्हणाले, शाहू स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या आवारात 150 गाळे धारक आहेत. ते दरवर्षी लाखो रुपयांचा कर नगरपालिकेला देत असतात. परंतु पालिकेची स्वच्छतेची जबाबदारी असताना कोणीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. कचराची गाडी येते आणि कचरा न उचलता निघून जाते. याचा अर्थ काय ? कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार करोडो रुपये पालिकेला देत आहे. तो पैसा कोठे खर्च होतो ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.