प्रतिनिधी / सातारा
काँग्रेसने जिल्ह्यात डॉ. सुरेश जाधव यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात काँग्रेस आणखी कशी भक्कम करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेस बळकट होत आहे. जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांनी शिवसेनेचा खंदा मोहरा गळाला लावला असून रणजित देशमुख हे उद्या शेकडो शिवसैनिकांसह ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आणखी बरेच जण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांनी दिली.
जिल्हात काँग्रेसला मोठा इतिहास आहे. काँग्रेसने जिल्ह्याला अनेक नेते दिले. काही नेते देश पातळीवर तर काही राज्य पातळीवर गेले होते. तीच काँग्रेस मागच्या काही वर्षात लेची पेची झाली होती तर केवळ कराड, पाटण,लोणंद आणि माण पुरती मर्यादित बनली होती. मागच्या विधानसभा निवडणूकीवेळी तर काँग्रेस आणखी डळमळीत बनली होती. पण काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये खांदे पालट करत जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. सुरेश जाधव यांच्याकडे जबाबदारी सोपवली. डॉक्टरांनी काँग्रेसची मोट पुन्हा बांधायला सुरुवात केली अन त्यात त्यांना यश येऊ लागले आहे. शिवसेनेचे नेते रणजित भैय्या हे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसह उद्या गांधी भवन येथे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे खटाव-माण विधानसभा मतदार संघात आमदारकीला तिकीट मागणारे रणजित भैय्या आता काँग्रेसचे होणार आहेत. त्यामुळे शिवसेनेला आता जिल्ह्यात खिंडार पडणार असून त्याबाबत जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, काँग्रेसच्या संपर्कात जिल्ह्यातील विविध पक्षातले पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आहेत.त्याचा ही लवकरच प्रवेश होईल.काँग्रेस जिल्ह्यात आणखी भक्कम करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.