कराड जनता बँक कृती समिती आक्रमक; विलीनीकरणाचीही मागणी
कराड / प्रतिनिधी :
कराड जनता सहकारी बँकेला कर्जवाटपात आर्थिक घोटाळे करून दिवाळखोरीपर्यंत पोहोचवणाऱ्या संचालक मंडळावर रिझर्व्ह बँकेने गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणून ठेवीदारांचे पैसे परत करावेत. तसेच रिझर्व्ह बँकेने या बँकेचे सक्षम बँकेत विलीनीकरण करून बँकिंग क्षेत्रावरील अविश्वास दूर करावा, अशी एकमुखी मागणी कराड जनता बँक बचाव व ठेवीदार कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली.
कृती समितीची बैठक काळ कराड येथे झाली. यावेळी कृती समितीचे सचिव विवेक ढापरे, उपाध्यक्ष दिनेश पेंढारकर, मार्गदर्शक आर,जी,पाटील, नितीन मोटे, विकास पाटील, सुरेश जाधव, प्रा,बुटीयानी, वाईचे रानडे इत्यादींची उपस्थिती होती, वाई, लोणंद, पाली, रहिमतपूर, कडेगाव, सातारा, काले, कराड , महाबळेश्वर आदी अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने ठेवीदार उपस्थित होते.
बँक घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच या बँकेचे सक्षम बँकेत विलीनीकरण करावे, अशा मागणीचे निवेदन सर्व ठेवीदारांच्या सह्या घेऊन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांना प्रत्यक्ष भेटून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.बँकेचे लिक्विडेटर मनोहर माळी यांनी फोनवरून संबोधित करतांना पाच लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळवण्यासाठी संबंधित शाखेत ठेवीदारांनी केवायसी कागदपत्रे देण्याचे आवाहन केले. बँकेचे ऑडिट करण्यासाठी जठार यांची नेमणूक केली असल्याचे सांगितले, तसेच पाच लाखांवरील ठेवी देण्यासाठी कर्जाची वसुली करून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल आर, जी. पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी आर, जी. पाटील, विवेक ढापरे, विकास पाटील, सुरेश जाधव, देसाई यांनी बैठकीला मार्गदर्शन केले. कृती समितीत प्रत्येक शाखा परिसरातील पाच सभासदांची नियुक्ती करून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेऊन बैठकीचा समारोप झाला.